Saturday, October 20, 2018

गहिरा अंधार आणि अमर्याद पाऊस : तुंबाड !


“‘तुंबाड’ हा सर्वोत्कृष्ट भयपट आहे का?” या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला एक पाऊल मागे सरकून “‘तुंबाड’ हा भयपट आहे का?” या प्रश्नापासून सुरुवात करावी लागेल. किंवा मग “चार-दोन दचकवणारे प्रसंग असलेला चित्रपट म्हणजे भयपट असतो का?” किंवा “भरपूर अंधार असलेला, वेगवान घटना घडणारा आणि अधेमध्ये जरा घाबरवणारा चित्रपट म्हणजे भयपट असतो का?” अशा प्रकारचे प्रतिप्रश्न करावे लागतील. (नारायण धारपांच्या कथांवर आधारित असल्याने कदाचित त्याला सरळ भयपट हे विशेषण लागलं असावं हा अजून एक मुद्दा.) कारण या न्यायाने तुंबाड कदाचित भयपट होऊही शकेल. कारण गूढ गहिरा अंधार आणि सतत कोसळणारा अमर्याद पाऊस हे तुंबाडचे दोन अत्यंत महत्वाचे नायक आहेत. कारण ते अतिशय रूपकात्मक पद्धतीने निर्लज्ज पाप आणि कधीही न संपणारी लालसा/हाव यांचं प्रतिनिधित्व करणारे म्हणून वापरण्यात आले आहेत. जवळपास प्रत्येक प्रसंगात अंधार किंवा पाऊस आहेच आणि  कित्येकदा दोन्हीही आहेत. तसं पाहता तुंबाडमध्ये अनेक रूपकं वापरली आहेत.  गाभा, मूळ, लालसा, वासनांधता, हाव, शाप आणि पराजय या सगळ्या सगळ्यासाठी !!

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या साधारण ३०-३५ वर्षांत ३-४ पिढ्यांमध्ये ही कथा घडते. आर्थिक असमानता, सामाजिक अन्याय, पूर्वजांपासून चालत आलेला शाप, लाचार गरिबी, अंधश्रद्धा, हाव, लोककथा, आद्यकथांमधले संदर्भ ,लालसेपायी शापाला ठोकर मारून आणि अनेकदा कोणत्याही मार्गाचा वापर करून अधिकाधिक श्रीमंत होण्याची धडपड या सगळ्यांना स्पर्श करत आणि सामावून घेत तुंबाडची कथा मार्गक्रमणा करत जाते. वर सांगितलेल्या दोन नायकांएवढाच किंवा त्यापेक्षाही महत्वाचा असणारा तुल्यबळ महानायक म्हणजे तुंबाड ची दृश्यात्मक परिणामकारकता. एकेका दृश्याची चौकट (फ्रेम) अत्यंत मेहनत घेऊन, कथेच्या बाजाला आणि प्रकृतीला न्याय देईल अशा तऱ्हेने मांडण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ उभा करताना तेव्हाची घरं, वाहनं, प्रसंग, लोकांच्या आवडीनिवडी, सवयी अतिशय कल्पकतेने निवडून खऱ्या वाटतील अशा रीतीने उभ्या केल्या आहेत. घर, वाडा, बोळ, अंगण अशा सामान्य स्थळी घडणारे साधे प्रसंग अंधार, पाऊस आणि गूढ वातावरण याने अपेक्षेपेक्षा अधिक भयप्रद होतील अशा रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रत्येक फ्रेममध्ये खास गडद टच देऊन चित्रपटाची गूढ प्रवृत्ती मेन्टेन्ड राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिलं गेलं आहे. यासाठी उच्च दर्जाच्या छायाचित्रणाबद्दल सिनेमॅटोग्राफर पंकज कुमारचं विशेष कौतुक केलं पाहिजे. हे सगळं होत असताना चित्रपटाचा स्वतःचा पहिल्या क्षणापासून असणारा वेग हा शेवटच्या प्रसंगापर्यंत अबाधित राहिल याची कटाक्षाने दक्षता घेण्यात आली आहे.

 वर म्हंटल्याप्रमाणे हा लौकिकार्थाने भयपट न वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे हा चित्रपट तत्सम प्रसंगांमधील सुरुवातीचे काही क्षण वगळता “बंद दारामागच्या खोलीत किंवा तळघरात काय आहे?” याबाबतचा कल्पनाविलास प्रेक्षकांना करू देत नाही. कारण सुरुवातीला काही वेळ भीतीदायक (काही प्रसंगी विनोदीही) आवाज ऐकवून काही क्षणातच तिथल्या प्रत्यक्ष अस्तित्वाचं आपल्याला पूर्ण दर्शन घडवतो. चित्रविचित्र आवाज ऐकवून, अचानक भुताला/आत्म्याला/पिशाच्चाला सामोरं उभं करून प्रेक्षकांना घाबरवून सोडणे हा या चित्रपटाचा उद्देश खचितच नाहीये. याउलट या अनुषंगाने येणाऱ्या मानवी भावभावना अधिकाधिक उच्च आणि गडद चित्रशैली वापरून मांडण्याला दिग्दर्शक अधिक महत्व देतो. लोभ, कुमार्ग, अविवेकीपणा, गैरमार्गाने मिळवलेलं धन, रंगेलपणा आणि या सगळ्यातून उत्पन्न झालेली अजून हाव असं हे एक पूर्णचक्र आहे. स्वतःच्या डोळ्यादेखत घडत असलेल्या चक्रात पुढची पिढी विनासायास न अडकली तरच नवल !

तुंबाड अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळतो किंवा त्यात सुस्पष्टता नाही. पण तो दिग्दर्शनातला ढिसाळपणा नसून मुद्दाम आणलेला धूसरपणा आहे. अशा प्रकारच्या गूढ चित्रपटांमध्ये काही जागा मुद्दाम मोकळ्या सोडून प्रेक्षकांच्या आकलनशक्ती आणि विचारक्षमतेला आव्हान देण्याचे प्रयत्न हुशार/प्रयोगशील दिग्दर्शक करत असतात. हा त्यातला प्रयत्न आहे. एखादा मुद्दा/प्रश्न पडद्यावर मांडला पण त्याचं उत्तर स्वतः दिग्दर्शक/लेखकाकडेचं नाहीये आणि त्यामुळे तो सोडून दिला अशा प्रकारच्या घिसाडघाईतून आलेला हा अर्धवटपणा नाही. तर अपूर्णतेतून निर्माण झालेल्या अनेक शक्यता मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

चित्रपट पाहताना राहून राहून मनात येत राहिलेला मुद्दा म्हणजे हा चित्रपट हिंदी ऐवजी मराठीत का केला गेला नाही? कोकणातल्या ब्राह्मण कुटुंबातली केशवपन केलेली स्त्री स्वतःच्या १०-१२ वर्षांच्या मुलांशी हिंदी बोलताना ऐकून फारच विनोदी वाटतं. किंवा अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पुण्यातही पुणेरी पाटी दाखवल्याबद्दल दिग्दर्शकाच्या तपशीलाबद्दल आग्रही असण्याचं आणि विनोदबुद्धीचं कौतुक वाटतंच मात्र त्याच वेळी ती पुणेरी पाटी हिंदीत बघून नक्कीच दाताखाली खडा आल्याचा भासही होतो. अगदी सहजतेने उपशीर्षकं (सबटायटल्स) पुरवता येण्याच्या काळात हे करता येणं सहज शक्य होतं. अर्थात अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी किंवा मराठी चित्रपटांच्या तिकीटाच्या किंमती वगैरे आर्थिक कारणांमुळे हे करता आलं नसेल असं मानायला जागा आहे.

चित्रपटात सुरुवातीला दिसणाऱ्या हस्तरच्या मूर्तीमधून मनात तयार होणारी हस्तरची प्रतिमा आणि कालांतराने दिसणारा हस्तर (आणि त्याची प्रतिरूपं) यात अतिप्रचंड तफावत आहे. तसंच भारतीय वंशाच्या/वळणाच्या पुराणकथेत उल्लेखलेला हस्तर आणि प्रत्यक्षात दिसणारा ममीसदृश अभारतीय हस्तर हा ही पचायला थोडा कठीण जातो हे ही नक्की.

तुंबाड आणि त्याच्या अप्रतिम दिग्दर्शन, छायांकन, वातावरण निर्मिती इ० बद्दल बोलून झाल्यावर संभाषणाची गाडी आपोआपच दिग्दर्शक राही अनिल बर्वेचा संघर्ष यावर येऊन ठेपते. चित्रपट अतिशय अप्रतिम आहेच पण तो खरोखरच त्या दर्जाचा आहे म्हणून. दिग्दर्शकाच्या अविरत आणि लांबलचक संघर्षामुळे तो ग्रेट आहे असं म्हणण्याची आवश्यकता नाही. उलट असं म्हणणं म्हणजे राहीच्या अप्रतिम दिग्दर्शनकौशल्यावर केलेला अन्याय आहे. दुर्दैवाने एखाद्या चित्रपटाच्या नशिबी अन्यांपेक्षा अधिक संघर्ष असतो एवढाच त्याचा अर्थ घेतला जावा. त्यामुळे तुंबाड अगदी आवर्जून आवर्जून बघायलाच हवा पण तो फक्त दिग्दर्शकाने केलेल्या संघर्षाला न्याय देण्यासाठी म्हणून नव्हे तर उत्तम निर्मितीमूल्य, दिग्दर्शन, छायाचित्रण, कथा/पटकथा असलेला हा चित्रपट त्या योग्यतेचा आहे म्हणून !!

Sunday, October 14, 2018

कोरिअन सूडपटाच्या वळणाने जाणारी 'आज्जी'



अनेकदा चित्रपटांची पोस्टर्स फार बोलकी असतात. एका छोट्याश्या चित्रात संपूर्ण चित्रपटाचा पोत मांडणारी, एक वातावरण निर्मिती करणारी किंवा प्रेक्षकाला समोर काय बघायला मिळणार आहे याचं निमिषार्धात वर्णन करणारी. ‘आज्जी’ चित्रपटाचं पोस्टर अगदी असंच आहे. पण अगदी मिनिमलीस्टीक. एक प्लेन काळाकुट्ट चेहरा, भेदक डोळे आणि भडक कुंकू. बास. एवढंच.

ही एक सूडकथा आहे परंतु आपण नेहमी पाहतो तशी नव्हे. थोडी वेगळी. बऱ्यापैकी कोरिअन सुडकथांच्या वळणाने जाणारी. कसंबसं हातातोंडाची गाठ पाडू शकणाऱ्या एका निम्नआर्थिक स्तरातल्या चौकोनी कुटुंबावर एका काळरात्री अचानक एक मोठा आघात होतो. अर्थात सुरुवातीला साधा वाटणारा आघात थोड्याच वेळात मोठं रूप धारण करतो. पटत नसलं तरी गरिबीपायी तोंड बंद ठेवून अन्याय सहन करण्यावाचून कुठलाही पर्याय नसल्याचं कुटुंबाच्या लवकरच लक्षात येतं. मात्र आज्जीला हे मान्य नसतं. थोडेफार प्रयत्न करूनही काहीच हाती लागत नसल्याचं पाहून आज्जी मनोमन काहीतरी ठरवून तिच्या कामाला लागते. थोडीथोडी माहिती गोळा करत, लोकांना भेटत, त्यांचे उपकार शिरावर बाळगत, एकेक पायरी वर चढत ती हळूहळू आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने मार्गक्रमणा करत जाते आणि अंतिमतः सूडाला परिणाम देते आणि मगच विराम घेते. मात्र हे सारं घडतं अतिशय संथपणे. पायरीपायरीने. अत्यंत मर्यादित संवादांच्या माध्यमातून. तसं पाहता कथेचा जीव एखाद्या शॉर्टफिल्म एवढा आहे. परंतु थोडे अधिक (कधी कधी अनावश्यकही) तपशील पुरवत कथेचा जीव वाढवल्याचा भास काही प्रसंगी होतो.

बऱ्यापैकी मंद गतीने पुढे सरकणाऱ्या या चित्रपटातल्या काही प्रसंगांतला बटबटीतपणा, रक्तपात हा प्रचंड धक्कादायक आहे. किमान हिंदीत तरी यापूर्वी कधीच न दाखवला गेलेला असा. काही निवडक प्रसंग खूपच भडक आहेत. म्हणजे दृश्यात्मक रीत्या फारच बोल्ड म्हणता येतील असे, वे टू ग्राफिकल, अंगावर येतील असे. वर कोरिअन सूडपटांचा उल्लेख केला तो निव्वळ याचसाठी. पण असे काही प्रसंग सोडता बाकी अन्य वेळ चित्रपट त्याच्या नॉर्मल संथ गतीत जात राहतो. बोलकं पोस्टर असा उल्लेख आला तो या अनुषंगाने. एक भडक कुंकू वगळता बाकी एकदम प्लेन काळाकुट्ट. चित्रपटाचा अधिकतम भाग हा रात्रीच्या अंधारात घडतो. परंतु यातले प्रसंग रात्रीच्या अंधारात अस्पष्ट घडताहेत असे दाखवलेले नाहीत. उलट काळरात्रीचा आणि पुढल्याही प्रत्येक रात्रीचा भीषण गडदपणा अंगावर येईल, घुसमट जाणवेल अशा सुस्पष्ट, ठसठशीत काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घटना घडत जाते.

आपल्याकडे असणाऱ्या अत्यंत अत्यंत मर्यादित स्रोतांचा (रिसोर्सेस) वापर करत, दुखण्यांवर मात देत आज्जीने शेवटाकडे एका मोठ्या घटनेला परिणाम देणं हे वाखाणण्याजोगं आहे आणि सुषमा देशपांडेंनी ते फारच प्रभावीपणे पार पाडलं आहे. अतिशय कमी संवादांमध्ये देहबोलीचा प्रभावी वापर करत त्यांनी आज्जी अगदी जिवंत केली आहे. विकास कुमारचा लाचार आणि स्वार्थी इन्स्पेक्टर तसंच अभिषेक बॅनर्जीचा विक्षिप्त/विकृत 'धावले' अतिशय परिणामकारक झाले आहेत. पण सर्वात महत्वाचा म्हणजे कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन सबकुछ असलेला देवाशीष मखीजा. भारतीय चित्रपटात इतके हिंस्र किंवा विकृत वाटावेत इतपत भडक प्रसंगांची मांडणी आणि चित्रीकरण करणं हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि ते मखीजाने लीलया पेललं आहे हे निश्चित.

कुठलाही चित्रपट परिपूर्ण नसतो त्याप्रमाणे ‘आज्जी’ ही नाहीच. निम्न आर्थिक आणि सामाजिक स्तरातल्या पात्रांकडून “हेल्प, फील, ऑप्शन” सारख्या सफाईदार इंग्रजी शब्दांची पेरणी खटकणारी आहे. तसंच काही अपवाद वगळता जवळपास प्रत्येक पात्र मराठीत असूनही सगळे संवाद मात्र हिंदीत आहेत. निदान तोंडदेखलंही मराठी वापरण्याची सूचकता दिग्दर्शकाला दाखवता आली नाही हे नक्कीच पटत नाही. परंतु एकूण चित्रपटाच्या तुलनेत हे दोष अगदीच दुर्लक्ष करण्याजोगे आहेत.

हा चित्रपट ‘मस्ट वॉच’ आहे का? तर भडक, बोल्ड मांडणी, रक्तपात यांचं वावडं असणाऱ्यांसाठी नक्कीच नाही. देशोदेशीच्या सूडपटांचे नियमित प्रेक्षक असलेल्यांसाठीही कदाचित नाही. परंतु हिंदीत सूडपटाचा एक नवीन वेगळा प्रयत्न म्हणून ज्यांना एक अनुभव घ्यायची इच्छा आहे त्या सर्वांसाठी मात्र निश्चितच !!

Friday, October 5, 2018

डोळसपणे पाहण्याचा अंधाधून


निव्वळ स्वतःच्या नावावर प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्याचं कसब सध्याच्या ज्या दिग्दर्शकांमध्ये आहे त्यात जेमतेम चारेक (आणि हा पाचवा) चित्रपट नावावर असणाऱ्या श्रीराम राघवनचं नाव नक्कीच फार वरचं आहे आणि कदाचित एखादा अपवाद वगळता जवळपास एकाही चित्रपटात राघवन प्रेक्षकांना निराश करत नाही. राघवनचा प्रमुख भर असतो तो ट्रीटमेंटवर. त्यात स्टाईल असते, वेग असतो, सफाईदारपणा असतो, गोंधळ असतो. थोडक्यात निओ-न्वारसाठी आवश्यक असलेला प्रत्येक घटक असतो. इतकंच काय तर चित्रपटाच्या शीर्षकात पण एक खुबी असते. ‘एक हसीना थी’ मधला ‘थी’ जेवढा महत्वाचा तेवढाच सूडाला वाहिलेल्या ‘बदलापूर’ मधला ‘बदला’. तेच चातुर्य आताच्या ‘अंधाधून’ या शीर्षकात. आता 'अंदाधुंद' या शब्दानंतर शक्यतो 'गोळीबार' (जो या चित्रपटातही आहे) याच शब्दाची सवय असलेया आपल्या कानांना आणि मेंदूला तोच शब्द एक अंध संगीतकार-गायक नायक असलेल्या चित्रपटाच्या शीर्षकात वापरताना तो फिरवून ‘अंधा-धून’ म्हणून ऐकवण्याचं कौशल्य तितकंच विलक्षण!

राघवनच्या चित्रपटाचा एक बऱ्यापैकी ठरलेला पॅटर्न असतो. प्रचंड वेगाने घडणाऱ्या धक्कादायक घडामोडींनी भरलेला पूर्वार्ध, समाजमान्य नसलेला रोमान्स किंवा विवाहबाह्य संबंध, जुन्या हिंदी चित्रपट/संगीत/कलाकार/गाणी/संवाद यांच्या संदर्भांची ठायी ठायी केलेली दृश्यात्मक पेरणी, प्रत्येक पात्राचं कुठल्या ना कुठल्या अपरिहार्य कारणाने का होईना पण चुकीच्या कृत्यात/गुन्ह्यात अडकणं आणि त्यामुळे त्याला (पात्राला) असणारी एक गडद किनार किंवा ग्रे शेड. ही भट्टी दर वेळी इतकी खमंग जमून येते की पट्टीच्या सुगरणीलाही कॉम्प्लेक्स यावा.

अंधाधून मधली भेळही अशीच नेहमीप्रमाणेच खुसखुशीतपणे जमून आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. सिनियर मोस्ट तब्बू पासून ते थेट दीडफुटी छोटू पर्यंत सगळ्यांनी केलेले भन्नाट अभिनय. तब्बूच्या तोडीस तोड वावरणारे आयुष्मान खुराणा आणि राधिका आपटे आहेत तसेच राघवनचे नेहमीचे यशस्वी अश्विनी कळसेकर आणि झाकीर हुसेनही.

अंध नायक आकाश (खुराणा) संगीत शिकवून आणि पियानो वाजवून उदरनिर्वाह चालवत असतो. परंतु प्रत्यक्षात तो अंध असल्याचा अभिनय करत असतो. आता यात स्पॉयलर अलर्ट देण्यासारखं काहीही नाही. कारण चित्रपट सुरु झाल्यावर जेमतेम अर्ध्या तासाच्या आतच हे तथाकथित रहस्य फुटतं. किंबहुना त्यात रहस्य असंही काहीच नाही कारण ट्रेलर मध्येही ते स्पष्टपणे दाखवलं आहेच. तर हा नायक त्याच्या दुर्दैवाने चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी पोचतो आणि अनवधानाने काही दुष्कृत्यांचा साक्षीदार बनतो. त्यातून सुटका करण्याच्या खटपटीत पहिलंच पाऊल इतकं चुकीचं पडतं की ते सावरताना गुंता वाढत वाढत जाऊन जीवावर बेतण्याची पाळी येते. अशा असंख्य वेगवान घटना आणि गुंत्यांच्या शिड्या चढत चढत चित्रपट मध्यंतरापर्यंत जबरदस्त लेवलला जाऊन पोचतो. तोच किंबहुना प्रसंगी थोडा अधिक वेगही मध्यंतरानंतर सुरुवातीला जाणवतो. नंतर पात्र, प्रसंग यांची सरमिसळ होऊन अनेक उपकथानकं जोडल्यासारखी वाटतात. या अनेक उपकथानकांच्या अनेकानेक उभ्या आडव्या धाग्यांमधला कुठला धागा महत्वाचा किंवा धरून ठेवण्यासारखा आहे या गोंधळात प्रेक्षक नक्कीच पडतो. पण दुर्दैवाने थोड्याफार अशाच द्वंद्वात खुद्द दिग्दर्शक देखील अडकल्यासारखा वाटतो. थोड्याफार फरकाने प्रत्येक चित्रपटात शेवटाच्या दिशेने प्रवास करताना राघवन याच द्वंद्वात अडकल्यासारखा वाटतो असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. अर्थात सुरुवातीपासून मिळणारा जबरदस्त अनुभव पाहता शेवटचा थोडासा गोंधळ दुर्लक्ष करता येण्याजोगा ठरतो हेही तितकंच खरं. या सगळ्या धावपळीत आणि गडबडगोंधळात कथानकाचा एक भाग म्हणून वेळोवेळी वाजणारी गाणी आणि पियानोचे सुश्राव्य पीसेस यांचा उल्लेख अनिवार्यच.

वरवर पाहता चित्रपट एका तथाकथित पॉझीटीव नोटवर संपतो. पण अगदी शेवटचा क्षण आणि नायकाची बॉडी लँग्वेज पाहता ओपनएन्डेड ठेवल्याचाही आभास निर्माण करतो. अर्थात कुठला शेवट स्वीकारायचा हे राघवन प्रेक्षकांवरच सोडतो. थोडक्यात जबरदस्त वेगाच्या आणि गुंत्याच्या धुंदीत अडकवून टाकणारा ‘अंधाधून’ आवर्जून आवर्जून पाहण्यासारखाच... पण डोळसपणे !!

ता क : जाता जाता आवर्जून नोंदवण्यासारखं निरीक्षण म्हणजे सुरुवातीला दाखवल्या जाणाऱ्या नामनिर्देशनांत (क्रेडिट्स) चित्रहार आणि छायागीतचा आवर्जून उल्लेख करणं हे श्रीराम राघवनचं ७०-८० च्या दशकातल्या हिंदी चित्रपट आणि हिंदी चित्रपटसंगीतावरचं प्रेम अधोरेखित करणारं !

Sunday, July 8, 2018

नॉट सो सेक्रड गेम्स !



नुकताच एक फार अर्थपूर्ण शेर वाचनात आला.

छप के बिकते थे जो अखबार..
इन दिनों वो बिक के छपा करते है !

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला वेळोवेळी देशोदेशींच्या राजकारणी, उद्योगपती, माफिया, विरोधी पक्ष, करमणूक जगत इत्यादींनी आपली बटीक म्हणून वापरल्याची असंख्य उदाहरणं आहेत. चौथ्या स्तंभाचा उपयोग करून जनमताचा कल चाचपणे, जनमत बदलणे किंवा हवे त्या दिशेला जनमताचा रेटा वळवणे, खोट्या कथा पसरवणे, असत्य/अर्धसत्य/अल्पसत्य बातम्या पेरणे,  खोटे सर्वे घेऊन त्यांचे निकाल छापणे, विशिष्ठ जात-धर्माबद्दलच्याच बातम्या छापणे किंवा दाबणे, किंवा फक्त मथळे वाचून मते बनवणाऱ्या 'अभिजनां' ना लक्ष्य करून खोडसाळ मथळा छापून, पुढे प्रश्नचिन्ह देऊन प्रत्यक्ष बातमीत मात्र वेगळेच तपशील देणे असे असंख्य प्रकार नियमितपणे होताना आढळतात. कालांतराने लोकांची वर्तमानपत्र वाचण्याची कमी होत चाललेली किंवा मोडलेली सवय लक्षात घेता या खोडसाळ शक्तींनी आपले लक्ष वृत्तपत्र किंवा मिडिया यांपुरतंच मर्यादित न ठेवता अन्य लोकप्रिय माध्यमाच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला देशाच्या दुर्दैवाने प्रमाणाबाहेर यश लाभू लागलं. आणि ते माध्यम म्हणजे, वेल.. नो प्राईजेस फॉर गेसिंग, चित्रपट माध्यम. अर्थात चित्रपट माध्यमाला एक विशिष्ठ अजेंडा डोळ्यासमोर ठेवून किंवा प्रसाराचं (Propaganda) माध्यम म्हणून वापरण्याचा प्रयोग या माध्यमाच्या जन्मापासून चालत आला आहे असं म्हंटलं तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरू नये. परंतु गेल्या काही वर्षांत मात्र याचा वापर फारच वाढल्याचं, चित्रपट/राजकारण/देशांतर्गत परिस्थिती/निवडणुका यांच्याबद्दल नियमित अपडेटेड असणाऱ्या आणि कुठलेही पूर्वग्रह न बाळगता, सारासार विचार करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या अगदी सहज लक्षात येऊ शकतं. आणि यासाठी कुठली उदाहरणंही द्यावी लागतील असंही मला वाटत नाही.


अर्थात हे सगळं प्रकर्षाने आठवण्याचं आणि एवढं लाउड थिंकिंग करण्याचं कारण म्हणजे नुकतीच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली विक्रम चंद्र यांच्या २००६ साली प्रकाशित झालेल्या 'सेक्रड गेम्स' या कादंबरीवर आधारित त्याच नावाची सिरीज. सर्वसाधारणपणे प्रॉपगॅंडा चित्रपट/मालिकांमध्ये आढळणारा अलिखित नियम इथेही कटाक्षाने पाळला गेलेला आहे. म्हणजे दर्शनी भागाची मांडणी, कथावस्तू ही एका सामान्य दरिद्री मराठी ब्राह्मण कुटुंबातल्या मुलाचा दरिद्री बालपण ते मुंबईचा अनधिकृत सर्वेसर्वा होण्याचा प्रवास या रुपात आपल्या समोर येते. पण त्याचवेळी पार्श्वभूमीवर हिडन अजेंडा राबवला जात असतो. सुरुवात होते ती प्रत्येक एपिसोडच्या संस्कृत किंवा संस्कृतोद्भव शीर्षकापासून. शीर्षक संस्कृत परंतु घडणारे प्रसंग मात्र अगदी विपरीत किंवा विकृत अर्थाने मांडलेले. सुरुवातीच्या काही मिनिटांतच "भगवानको लं* फर्क पडता है" सारखा प्रक्षोभक संवाद प्रमुख पात्राच्या तोंडी घालून मालिका निर्माते मालिकेची दिशा आणि हेतू स्पष्टपणे मांडण्यात कुठलीही आडकाठी करत नाहीत. पण बॉलीवूड मध्ये 'प्रसिद्ध' असणाऱ्या तथाकथित प्रस्थापितांविरुद्ध लिहिणाऱ्या/बोलणाऱ्या अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी या नामांकित दिग्दर्शकद्वयीची ही मालिका असल्याने आपण त्या घटनेकडे दुर्लक्ष करून मालिका पुढे पाहायला लागतो. पण हळूहळू शीर्षकगीतात दिसणाऱ्या देवीदेवता, प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीला येणारी श्रीयंत्र सदृष चिन्हं अशा खुणा आपल्याला उठून दिसू लागतात. त्यामुळे निर्मात्यांच्या हेतूबद्दल नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह आपल्या मनात उभं राहतं. त्यानंतर वारंवार दिसत राहतात ते रामायणाचे उल्लेख, रामानंद सागर यांच्या रामायणाचे प्रसंग, रामलीलेचे प्रसंग, किंवा उद्घाटन, लग्न काहीही असो पण ते अट्टहासाने रामायणाच्या प्रसंगांच्याच पार्श्वभूमीवर घडवण्याचा दिग्दर्शकद्वयीचा आग्रह आणि तसं पाहता रूढार्थाने त्याचा कुठेही कनेक्ट नसताना !! किंवा ब्राम्हण बापाची वेश्या/बाहेरख्याली पत्नी, प्रमुख भाग जिथे कथा प्रत्यक्षात उलगडत जाते तो एरिया म्हणजे 'गोपालमठ' (धारावी?), गन्स लपवण्यात आलेल्या विशालकाय गोडाऊनचं नाव 'वेद' असणे हे तपशीलही हेतुपुरस्सरपणे लादल्यासारखे वाटतात. आणि सगळ्यात शेवटी दाखवला जातो तो मुंबईवर होऊ घातलेल्या हल्ल्याचा प्रमुख मास्टरमाईंड हा अन्य कोणी नसून एक तथाकथित मोठा हिंदू संत असणं !! अर्थात हा प्रसंग आणि क्वांटिको, पीके, सिंघम-२, काला इत्यादींमधले प्रसंग यांच्यामधला एक 'समान दुवा' सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे नियमित अपडेटेड असणाऱ्या प्रेक्षकांच्या चटकन लक्षात येतोच.

ही दिग्दर्शकद्वयी सत्यपरिस्थितीचं चित्रण मांडण्याबद्दल आणि रेखीव पटकथेबद्दल विशेष प्रसिद्ध आहे. परंतु दुर्दैवाने त्या दोन्ही विभागांतही गोंधळ किंवा तडजोडी आढळतात. आपल्या रखेलीवर आपल्यासमोर पैसे उधळले म्हणून होऊ घातलेल्या हिंदू डॉनवर गोळ्यांचा वर्षाव करणारा आणि दुबईपर्यंत कनेक्शन्स असणारा मुसलमान डॉन त्याच हिंदू डॉनने काही दिवसांतच तिला सरळसरळ पळवून नेल्यावर मात्र काहीही न करता शांत बसून राहतो. बाबरी मशीद पतनाची दृश्यं तपशीलवार दाखवून मात्र त्याचा सूड म्हणून घडवल्या गेलेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांचा अगदी अगदी नगण्य उल्लेख. किंवा मग गणपतीला खरवसाचा नैवेद्य दाखवण्यासारखा निव्वळ हास्यास्पद प्रसंग. किंवा सुरुवातीला नायकाला मदत करणाऱ्या डॉनने एकाएकी सगळी रहस्य अर्धवट ठेवून कोडी घालून केलेली आत्महत्या हा तर निव्वळ मूर्खपणा वाटतो. त्या मूर्खपणाची तुलना फक्त डॅन ब्राऊनच्या 'ओरिजीन' मध्ये प्रमुख पात्राने आत्महत्या करून शेकडो कोडी घालून ठेवून २४ तास ताणून ठेवलेल्या बिनडोक पळापळीशीच होऊ शकते. किंवा मग गायतोंडे नावाच्या प्रमुख पात्राच्या तोंडी एकही धडका मराठी संवाद नसणे, किंवा परुळेकर (कादंबरीत याचं नाव पारूळकर आहे) नावाच्या प्रमुख पात्राच्या तोंडी आलेलं तोडकंमोडकं मराठी. गंमत म्हणजे काही लोक त्याला परुळेकर म्हणतात, काही पारुलकर तर काही परूलकर !!

खरं पाहायला गेलं तर ही एका साध्या भाईची गँगवॉर टाईप कथा आहे. साधा गरिबीतून वर येणारा गुंड एक एक टप्पे पार करत करत मुंबईच्या काळ्या दुनियेचा अनभिषिक्त सम्राट बनायची स्वप्नं पाहता पाहता हळूहळू एक दिवस खरंच तिथे पोचतो आणि या प्रवासाचं चित्रण म्हणजे ही कथा. आणि ही चावून चोथा झालेली कथाही आपण अन्य ठिकाणी पाहिलेल्या हजारो कथांप्रमाणेच आहे. पावलोपावली आढळणाऱ्या क्लिशेंनी अक्षरशः भरलेली. गरिबीतलं बालपण, स्थानिक भाईचं बोट धरून एक दिवस त्याच्याच खांद्यावर पाय ठेवून वर चढणारा कथानायक भाई, राजकारणी, पोलीस, बॉलीवूड या सगळयांना हवं तसं वळवणारा भाई, मग एक दिवस त्याचाही वाईट काळ येणे आणि मग विनाशाच्या दिशेने चालू होणारा प्रवास, आणि या सगळ्यात त्याच्या मागे हात धुवून लागलेला अंडर-परफॉर्मिंग इन्स्पेक्टर, त्याचा गडद भूतकाळ, त्याचं सहकारी आणि वरिष्ठांमध्ये नावडतं असणं हे सगळं सगळं आपण पाहिलेलं आहे. पण मग तरीही या वेबसिरीजला मिळणाऱ्या एवढ्या रेटिंगचं कारण काय? एक कारण कदाचित असं असेल की मूळ कादंबरी वाचलेल्यांना त्याची सिरीज मांडणी कशी असेल हे बघण्याची असलेली उत्सुकता (मी कादंबरी वाचलेली नाहीये.) किंवा दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे अशा भाईछापच काय पण अन्य कुठल्याही हिंदी चित्रपट/मालिकेत न दिसलेले सेक्स, वासना, संभोग, नग्नता, विकृतपणा, क्षणोक्षणी येणाऱ्या शिव्या, व्यसनं आणि वेबसिरीज असल्याने सेन्सॉरबोर्ड आपलं 'घनता' वाकडं करू शकत नसल्याचा निर्मात्यांचा उन्माद या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण !!

अर्थात काही गोष्टी वेगळ्या आहेत आणि खरोखर चांगल्याही आहेत. म्हणजे ठराविक काळानंतर येणारे देशाच्या राजकारणातले महत्वाचे प्रसंग, प्रमुख पात्राच्या तोंडून राजकारणी लोकांवर केली गेलेली टीका यांची मांडणी चांगली आहे. उदा थोडं तपशीलवार मांडलेलं शाहबानो प्रकरण आणि राजीव गांधी, रथयात्रा आणि धर्माचा उन्माद वगैरे गोष्टी थेट दाखवल्या आहेत. अप्रतिम दिग्दर्शन आणि छायाचित्रण यांचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे सैफ (लोकल पोलीस) आणि राधिका आपटे (रॉ) यांच्यात शेवटच्या काही मिनिटांत घडणारा हॉटेलमधला प्रसंग. काही कारणांमुळे त्यांच्यात (व्यावसायिक) गैरसमज झालेले असतात. त्यानंतर समेटासाठीची ही बैठक असते. सुरुवातीला दोघेही जरा गुश्श्यात असल्याने लॉंगशॉट घेऊन दोघांच्यामध्ये पिलर दाखवला आहे. सुरुवातीची भडास काढून झाल्यावर दोघेही एकेक पाउल पुढे टाकून समेट करायला तयार होतात आणि अचानक कॅमेरा हॉटेलच्या आतून दाखवला जातो, दोघेही एकाच फ्रेममध्ये असतात आणि आधीचा पिलर दोघांच्या मागे झाकला गेलेला असतो. असे काही भन्नाट प्रसंग आहेत. राधिका आणि सैफ या दोघांनीही सिरीजमधलं आपापलं स्थान ओळखून त्याला न्याय मिळेल अशा प्रकारे केलेला अभिनय ही जमेची बाजू. पण सगळ्यात जबरदस्त वावर आहे तो जितेंद्र जोशीचा. प्रसंगानुरूप बदलणारी संवादफेक, आवाज, हावभाव आणि बिनधास्त वावर या सगळ्यामुळे तो एकदम सच्चा कॉन्स्टेबल वाटतो.

दुर्दैवाने चांगल्या किंवा मला आवडलेल्या/पटलेल्या गोष्टींची यादी आणि खटकलेल्या गोष्टींची यादी यांच्या लांबीची कुठेच तुलना होऊ शकत नाही. अर्थात म्हणून कोणी ही मालिका बघू नये का? किंवा मालिकेवर बंदी आणावी का? तर नाही आणि नाही. तसं अजिबात नाही. मी तर म्हणेन प्रत्येकाने आवर्जून बघावी. पण बघाल ते समजून उमजून बघा. नीट अर्थ समजून घेऊन बघा. बी यॉर ओन जज. तसंच बंदी वगैरेचा तर संबंधही नाही. मी व्यक्तिशः कुठल्याही बंदीच्या विरुद्धच आहे. पण म्हणून असत्य पुढे रेटणं हे कितपत योग्य आहे हे पाहणं आणि शीर्षकातलं 'पावित्र्य' कंटेंटमध्ये कितपत राखलं जातं हेही पाहणं हा शेवटी ज्याच्या त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीचा प्रश्न आहे !!

तळटीप : विक्रमादित्य मोटवानीने या मालिकेवर काम करायला *२०१४* पासून सुरुवात केली हा नक्कीच योगायोग नसावा!!

Sunday, June 3, 2018

श्रोडिंगरच्या मांजराचा थरारक खेळ : कोहरन्स


सायन्स फिक्शन अर्थात साय-फाय हा हॉलीवूडचा निर्विवादपणे अत्यंत लाडका चित्रप्रकार (जॉनर) आहे. त्यात प्रामुख्याने परग्रहावरची जीवसृष्टी, त्यांनी पृथ्वी- त्यातही अमेरिका- त्यात पुन्हा न्यूयॉर्क – आणि त्यात विशेषत्वाने टाईम स्क्वेअरवर केलेले हल्ले आणि अखिल मानवजातीने – अर्थात न्यूयॉर्कवासियांनी शौर्याने आणि धैर्याने त्याला तोंड देऊन (प्रसंगी एखाद्या किंवा डझनभर सुपरहिरोंच्या मदतीने) संपादित केलेले विजय हा नक्कीच त्याचा एक उप-चित्रप्रकार म्हणून गणला जाऊ शकतो. अर्थात या चाकोरीबद्धतेत न अडकणारे वेगळी मांडणी करणारे कॉन्टॅक्ट, सेफ्टी नॉट गॅरंटेड, मून, अरायवल, अनायलेशन सारखे अनेक उत्कृष्ट साय-फाय चित्रपटही निर्माण झाले. एलियन्सच्या खालोखाल दुसरा लाडका प्रकार म्हणजे टाईम-ट्रॅवल ज्याच्यावरच्या चित्रपटांची यादी लिहायला बसलो तर दिवसचे दिवस पुरायचे नाहीत.

पण यासारख्या कुठल्याही घासून गुळगुळीत न झालेल्या वैज्ञानिक संकल्पनांवरही काही निवडक चित्रपट बनले आहेत. अशी एक लाडकी वैज्ञानिक संकल्पना म्हणजे ‘श्रोडिंगर्स कॅट’ आणि ही कल्पना फुलवून, त्याला अजून कल्पनाशक्तीची जोड देऊन, अनेक शक्याताशक्यतांचा विचार करून फुलवत नेलेली कथा आणि प्रसंगी भयावह वाटणारे निष्कर्ष काढणारा चित्रपट म्हणजे ‘कोहरन्स’. ‘श्रोडिंगर्स कॅट’ चे उल्लेख असणारे, संदर्भ देणारे पर्सन ऑफ इंटरेस्ट, बिग बँग थिअरी, द प्रेस्टीज, अ सिरीयस मॅन सारखे अनेक चित्रपट, सिरीज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ‘श्रोडिंगर्स कॅट’ला सर्वस्वी वाहिलेला, ती संकल्पना फुलवून वेगळ्या धाटणीचा प्रयोग मांडणारा कोहरन्स हा एकमेवच.


क्वांटम फिजिक्समधल्या क्वांटम सुपरपोझिशन या संकल्पनेला वैचारिक पातळीवर आव्हान देण्यासाठी एर्विन श्रोडिंगर नावाच्या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाने केलेला एक वैचारिक प्रयोग म्हणजे श्रोडिंगरची मांजर अर्थात ‘श्रोडिंगर्स कॅट’. प्रयोग अगदी सोपा करून सांगायचा तर स्टीलच्या एका बंद खोक्यात एक किरणोत्सर्गी पदार्थ, त्या किरणोत्सर्गामुळे (कदाचित) फुटू शकेल अशी विषाने भरलेली कुपी आणि एक मांजर ठेवली आहे. क्वांटम सुपरपोझिशन संकल्पना गृहीत धरली असता ती मांजर एकाच वेळी जिवंत आणि मृत असू शकते !! हा झाला त्या ‘श्रोडिंगर्स कॅट’ संकल्पनेचा गाभा. पण या छोट्याश्या (भासणाऱ्या) कल्पनेशी खेळत, त्यात नवीन पैलू जोडत, वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करत, विविध शक्यता मांडत, या साऱ्याला एक मानवी नात्यांचा दृष्टीकोन देत दिग्दर्शक जेम्स वार्ड बिर्कीटने जो एक अफलातून प्रयोग रचला आहे त्याला खरंच तोड नाही.


मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप गेटटुगेदर पार्टीसाठी त्यांच्यातल्याच एका कुटुंबाच्या घरी जमतो. सुरुवातीला लक्षातही येणार नाही अशा छोट्या छोट्या घडत जातात पण त्यांचे परिणाम दूरगामी होणार असतात हे त्या पात्रांबरोबर आपल्याही लक्षात यायला लागतं. ‘श्रोडिंगर्स कॅट’ हा विचार मध्यवर्ती ठेवून ‘डोअर टू नोव्हेअर’ चा शिताफीने वापर करत ती सगळी पात्र हळूहळू आपल्या डोळ्यासमोरच ‘कॅट’ बनत जातानाचा एक अशक्य खेळ दिग्दर्शकाने खेळला आहे. काहीतरी गडबड आहे हे सगळ्यांनाच जाणवत असतं आणि जो तो आपापल्या परीने त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो. निरनिराळ्या रंगांचे लाईट्स, फोटोज, आकडे, पुस्तक अशा समोरच दिसणाऱ्या साध्या गोष्टींचा वापर करत सगळेजण जराशी गडबडगोंधळ झालेली परिस्थिती आवाक्यात आणायचा प्रयत्न करत असतात. पण याच सगळ्या गोष्टींचा, पात्रांचा संथ गतीने गुंता होत होत परिस्थिती हाताबाहेर जायला लागते. या सगळ्या गुंत्यात पुन्हा लोकांची पूर्वायुष्यं, नातेसंबंधातले गैरसमज या पैलूंमुळे अजूनच बिकट अवस्था होत जाते. सुरुवातीला किंचित गुंतलेल्या, विचित्र वाटणाऱ्या घटना शेवटाकडे जाताजाता एवढ्या भयंकर स्वरूप धारण करतात की ‘श्रोडिंगर्स कॅट’ हा वैचारिक प्रयोग जर चुकून खरंच सत्यात उतरवला गेला आणि खरंचं बिनसला तर कुठल्या अवघड परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागेल या कल्पनेनेही आपण थरारतो.

कोहरन्स म्हणजे सुसंगतपणा जी सुरुवातीची काही मिनिटं सोडली तर चुकुनही कुठेच दिसत नाही. त्यामुळे या कल्पकपणे निवडलेल्या विरोधाभासी शीर्षकाबद्दल आपल्याला चित्रनिर्मात्यांचं नक्कीच विशेष कौतुक वाटून जातं. अर्थात त्यामुळे चित्रपटात घडणाऱ्या घटना, संवाद इत्यादींकडे आपल्याला अगदी बारकाईने लक्ष द्यावं लागतं. ज्याप्रमाणे ‘द प्रेस्टीज’ च्या टॅगलाईनमध्ये नोलन आपल्याला विचारतो “आर यु वॉचिंग क्लोजली?” अगदी तसंच. महत्वाची गोष्ट म्हणजे हा एक लो बजेट साय-फाय आहे. बरेच कलाकार ओळखीचे नाहीत, काही प्रसंगी संवाद ओवरलॅपिंग आहेत, संवाद म्हणणाऱ्या पात्राकडे कॅमेरा असेलच असं नाही असे बरेच मुद्दे आहेत. पार्टीत जमलेल्या ग्रुपच्या तोंडी गप्पा मारताना अनेक तपशील येऊन जातात. त्यातले किती महत्वाचे, किती कथेला पुढे घेऊन जाणारे, किती उगाचंच आलेले असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडू शकतो. अर्थात चित्रपटाचं हे स्वरूप जाणूनबुजून अंगिकारलेलं आहे हे निश्चितच.

एलियन्सचे हल्ले, त्याविरुद्ध पृथ्वीवासीयांनी आणि सुपरहिरोंनी दिलेले लढे किंवा परकीय जीवसृष्टी, टाईम-ट्रॅवल या सगळ्याचा कंटाळा आला असेल आणि ‘क्लोजली वॉचिंग’ करण्याची तयारी असेल तर या कोहरन्स रुपी विरोधाभासाचा आस्वाद आवर्जून घ्यायलाच हवा.

Monday, May 21, 2018

मानापमानाचा ज्वालामुखी : द इन्सल्ट


परभाषिक चित्रपट बघत असताना सबटायटल्स वाचता वाचता चित्रपट पाहण्याची कला एकदा अवगत झाली की त्यासारखं सुख नाही. अर्थात अनेकांना हे असलं सबटायटल्स वाचत चित्रपट पाहायला आवडत नाही. परंतु निव्वळ या कारणामुळे जागतिक चित्रपटांच्या विशाल खजिन्याला मुकणं नक्कीच योग्य नाही. कारण सब्स वाचत वाचत चित्रपट पहायची सवय कालांतराने होतेच. अर्थात ही फक्त पहिली पायरी झाली. दुसरी पायरी किंचित अवघड आहे. म्हणजे ज्यासाठी चित्रपट पाहण्याआधी मुद्दाम परिश्रम घ्यावे लागतील अशी. आपण ज्या देशीचा, ज्या भाषेतला चित्रपट पाहणार आहोत त्या देशातील चालीरीती, सण उत्सव, रीतीरिवाज, लोकसंख्या, धर्म, लोकांच्या आवडीनिवडी, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी इत्यादींची माहिती करून घेणे ही प्रेक्षक म्हणून एक उत्तम आणि तितकीच आवश्यक सवय आहे. ही माहिती करून घेतलेली असली की, "अरेच्चा हे काय दाखवतायत?" किंवा "छे, असं कधी होतं का कुठे?" सारखे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. अर्थात आपले बॉलीवूडी मस्सालेदार चित्रपट बघतानाही हे प्रश्न क्षणोक्षणी पडतातच परंतु वरच्या यादीतल्या सगळ्या गोष्टींचा आपण कित्तीही अभ्यास केला तरी त्याची समाधानकारक उत्तरं कधीच मिळूच शकत नाहीत.

पण अर्थातच हा नियम आशयघन परभाषिक चित्रपटांना लागू होत नाही. वरील बाबींचा निदान थोडा तरी अभ्यास करून चित्रपट बघायला बसलो तर चित्रपट तुलनेने सहजरीत्या कळायला आपल्याला मदत होते. मग तो पॅन'ज लॅबरीन्थ (स्पॅनिश) असो की अंडर द शॅडो किंवा अ सेपरेशन (दोन्ही इराणी) असो की द ब्रदरहूड ऑफ वॉर किंवा जॉईन्ट सेक्युरिटी एरीया (दोन्ही कोरियन) असो.


लॅबनॉनबद्दल आपल्याला काय माहीत आहे असा प्रश्न आपण स्वतःला विचारला असता तो एक देश आहे यापलीकडे किंवा फार तर बेरूत/बेरूट ही त्याची राजधानी आहे यापलीकडे इतर काही विशेष माहिती असण्याची शक्यता फार थोडी असते. पण एवढ्या तुटपुंज्या माहितीच्या आधारावर आपण २०१७ साली प्रदर्शित झालेला आणि ऑस्कर मध्ये सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट म्हणून नामनिर्देशित झालेला 'द इन्सल्ट' हा लॅबनीज चित्रपट बघायला बसलो तर कदाचित "एवढा का पराचा कावळा करतायत हे लोक?" असा प्रश्न खचितच पडू शकतो. पण लॅबनॉनचे सीरिया, इस्रायल आणि सायप्रस यासारखे शेजारी आहेत, सुमारे साठ लाख लोक असलेल्या या देशाची लोकसंख्या अनेक पंथीय मुस्लिम आणि कित्येक पंथीय ख्रिश्चन लोकांमध्ये विभागली गेलेली असून तिथे काही लाख सीरियन आणि पॅलेस्टीनी निर्वासितही आहेत, अजून अवाक करणारी माहिती म्हणजे धार्मिक अशांतता/अस्थिरतेच्या भीतीने १९३२ पासून तिथे अधिकृत जनगणनाच झालेली नाही किंवा एरिअल शेरॉन कोण आणि पॅलेस्टीनी नागरिकांच्या त्याच्याबद्दल काय भावना आहेत? यांसारखी काही मूलभूत माहिती आपल्याला असली (जी अर्थातच चित्रपट पाहताना मध्ये मध्ये विकीही करता येते) की पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या साध्या सोप्या (भासणाऱ्या) घटनांमागे दडलेले भयावह संदर्भ लक्षात यायला मदत होते. चित्रपटातल्या पात्रांच्या राग/लोभ, मानापमानाशी आपण एकरूप होऊ शकतो. आणि अचानकच चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या गेलेल्या सुचनेचा (डिस्क्लेमर) अर्थ आपल्याला उलगडला गेल्यासारखं वाटायला लागतं. ती सूचना अशी.

“द व्ह्यूज अँड ओपिनियन्स एक्स्प्रेस्ड इन धिस फिल्म आर दोज ऑफ द ऑथर्स अँड द डायरेक्टर अँड डू नॉट रिफ्लेक्ट द ऑफिशियल पॉलिसी ऑर पोझिशन ऑफ द लॅबनीज गव्हर्नमेंट” 


रस्त्यावर अतिशय क्षुल्लक कारणावरून झालेलं भांडण, त्यातून उद्भवलेले मानापमान आणि परिस्थिती भलत्याच दिशेने जात जात शेवटी तिला भयानक हिंसक रूप मिळून ओढवलेला राष्ट्रीय आणीबाणीचा प्रसंग आणि थेट राष्ट्राध्यक्षांना करावा लागलेला हस्तक्षेप असा कथेचा अवाका आहे. अर्थातच हे वाचल्यावर रस्त्यावर झालेल्या भांडणाचं रुपांतर राष्ट्रीय पातळीवरच्या दंगलीत होणं कसं शक्य आहे हा प्रश्न साहजिकच पडू शकतो. परंतु भांडण झालेल्या दोन व्यक्ती, त्यांच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पातळीतील तफावत या सगळ्याची सांगड आपण चित्रपटाआधी संग्रहित केलेल्या माहितीशी घातली की जे पडद्यावर घडतंय ते सहज पटू लागतं किंबहुना ते घडू नये असंही आपल्याला मनोमन वाटायला लागतं. कधी कधी इतका अतिरेक होतो की दोन्ही व्यक्ती झालं गेलं सगळं विसरून जायला तयार होतात किंवा समोरच्याच्या बाजूनेही बोलायला लागतात पण तोवर परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली असते की त्यांची अशी तडजोड होणं हे त्यांच्या वकिलांना त्यांच्यातल्या राजकारणामुळे आणि अन्य गुंतागुंतीमुळे मान्य होणं शक्यच नसतं. दोन्ही व्यक्तींच्या अपेक्षा छोट्याच असतात परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. भूतकाळ उकरून काढले जातात, चिखलफेक केली जाते आणि प्रकरण चिघळत ठेवलं जातं. अखेरीस एका टप्प्यावर येऊन चित्रपट संपतो तेव्हा दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगून जातात. 

चित्रपटातले काही भेदक आणि जागतिक आणि लॅबनीज परिस्थितीवर थेट भाष्य करणारे संवाद ऐकल्यावर चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवला गेलेला डिस्क्लेमर कसा आवश्यक होता हे आपल्याला नक्कीच पटतं.

  • “युअर ऑनर, वुई लिव इन द मिडल इस्ट. द वर्ड "ऑफेन्सीव" वॉज बॉर्न हिअर !!”
  • “नो वन हॅज अ मोनोपॉली ऑन सफरिंग”
  • “देअर इज द युएन, द एनजीओज, द ह्युमॅनीटेरीअन ऑर्गनायझेशन्स, द लेफ्ट्स, द लिबरल्स. दे ऑल रूट फॉर (सपोर्ट) पॅलेस्टॅनियन्स. अँड डोंट फर्गेट, दे हेट अस. इट्स ट्रेंडी टू डिफेंड दोज पीपल.” 

हा चित्रपट पाहताना अनेकदा ‘वाईल्ड टेल्स’ ची आठवण होते. वाईल्ड टेल्स मध्ये परस्परांशी संबंध नसलेल्या परंतु मूळ गाभा एकच असलेल्या सहा लघुकथा आहेत. त्यातलीच एखादी लघुकथा घेऊन, इम्प्रोवाईज करून, फुलवून हा चित्रपट बनवला आहे असंही कधी कधी वाटून जातं. अर्थात वाईल्ड टेल्स मध्ये सगळा भर सुडावर आहे तर इथे तोच भर मानापमानावर आहे.

प्रमुख भूमिकेत असलेल्या अदेल करम आणि कामेल अल बाशा या दोन कलाकारांनी आपापल्या सामाजिक भूमिका आणि धार्मिक श्रद्धा उत्तमरीत्या वठवल्या आहेत. चित्रपट संपत आला तरी कोण चूक आहे आणि कोण बरोबर किंवा या एवढ्या सगळ्या व्यापात मूळ चूक कोणाची होती या प्रश्नाचं अचूक उत्तर कितीही प्रयत्न केला तरी आपण देऊ शकत नाही आणि याचं सगळं श्रेय झिआद दुइरीच्या अप्रतिम दिग्दर्शनाला आहे. हे सगळं का घडलं, कोणी घडवलं, टाळता आलं असतं का, याची जवाबदारी कोणाच्या माथी, हे पुन्हा होणं टाळता येईल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे असलं काही आपल्या देशात असंतोषाने धुमसणाऱ्या संवेदनशील विभागांत/शहरात घडलं तर परिणाम किती भयानक होतील अशा शेकडो प्रश्नाचं मोहोळ आपल्या मनात उठवून चित्रपट संपतो. पण पडद्यावरच. आपल्या डोक्यात तो संपायला काही काळ नक्कीच जायला लागणार असतो !