Tuesday, August 16, 2022

Gained* in Translation

सहसा चित्रपट हा तो ज्या पुस्तक/कादंबरीवर आधारित आहे त्याच्या मानाने डावा (वैचारिक नव्हे गुणात्मक रित्या) असतो हा एक सर्वमान्य प्रघात आहे. आणि तो सिद्ध करण्यासाठी खंडीने देता येतील इतके पुरावेही उपलब्ध आहेत. या विषयावर अनेकदा लेखन झालेलं आहे किंवा पुस्तकावर आधारित कुठलाही (काही सन्माननीय अपवाद वगळता) चित्रपट आपण पुराव्यादाखल घेऊ शकतो.

या प्रवादाला छेद देणारा किंवा नियम सिद्ध करणारे असे काही अपवाद नुकतेच नजरेस आल्याने हा लेखप्रपंच. अर्थात हे चित्रपट खूप जुने आहेत आणि ते ज्या पुस्तकांवर आधारित आहेत ते तरअर्थातचत्याहूनही जुने आहेत. ते चित्रपट मी फार पूर्वीच बघितले होते. मात्र पुस्तकं वाचण्याचा योग अलीकडेच आल्यानेजगन्मान्य प्रवादाला छेद देणारं उदाहरण वाटलं म्हणून इथे मांडतोय इतकंच. अर्थात अनेकांना हा अपवाद न वाटता नियमच वाटेलअर्थात पुस्तकच चित्रपटापेक्षा अधिक दर्जेदार आहे असं वाटू शकतंच आणि तेही अमान्य असण्याचं काहीच कारण नाही.

सध्या चुकीच्या कारणांसाठी प्रसिद्ध झालेला 'फोरेस्ट गम्प१९९४ साली प्रदर्शित झाला आणि Shawshank Redemption (याच्या बद्दलही नंतर बोलूच) सारख्या भल्याभल्या तगड्या चित्रपटांना आस्मान दाखवून त्याने ढिगाने ऑस्करच्या बाहुल्याही जमा केल्या. किमान चड्ढा मुळे का होईना पण गम्प बघितलेल्यांची संख्या अमाप आहे त्यामुळे त्याबद्दल विशेष काही लिहायची आवश्यकता नाहीच. पण तरीही अत्यंत कमी बुद्ध्यांक असलेल्याअमेरिकेच्या गेल्या ५०-६० वर्षांच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांचा साक्षीदार असणारा (प्रसंगी त्या घडायला कारणीभूत ठरणारा. उदा. वॉटरगेट प्रकरण) अत्यंत सुदैवी आणि वैयक्तिक आयुष्यात तितकाच दुर्दैवी असणाऱ्या एका सर्वसामान्य अमेरिकन तरुणाची कथा असं याचं वर्णन करता येईल. हा चित्रपट Winston Groom या अमेरिकन लेखकाच्या Forrest Gump याच नावाच्या १९८६ साली प्रकाशित झालेल्या आणि अल्पावधीतच वाचकांनी प्रचंड डोक्यावर घेतलेल्या पुस्तकावर आधारित होता. Winston Groom चं हे पुस्तक नुकतंच वाचलं. गम्पचा निरागसपणाबावळटपणासुदैवी असणं हे चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच आहे. सुरुवातीचे काही प्रसंगफोरेस्ट आणि त्याची मैत्रीण जेनीचे संबंध हे सगळे पूर्वार्धात आहेत. त्यानंतर फोरेस्टची चीनची सफर आणि त्यात चीनचा सर्वेसर्वा माओ यांगत्से नदीत पोहत असताना बुडायला लागतो आणि फोरेस्ट जीवावर उदार होऊन त्याला वाचवतोत्यामुळे चीनी जनता त्याच्यावर प्रचंड प्रक्षुब्ध होते असा एक अतिशय खुसखुशीत प्रसंग त्यात आहे. चित्रपटाने आपला परीघ अमेरिकन राजकारण आणि समाजजीवन एवढ्यापुरताच मर्यादित ठेवलेला असल्याने कदाचित चित्रपटात हा प्रसंग नसावा. परंतु त्याची भरपाई म्हणून अमेरिकन राजकारणातले अनेक प्रसंग मजेशीररित्या मांडण्यात आले आहेत हे ही खरंच. पण त्यानंतर पुस्तकात आश्चर्यकारकरित्या फोरेस्टची निवड अंतराळवीर म्हणून होतेतो सू नावाच्या एका चिम्पाझीबरोबर अंतराळात जातोतिथे अनेक विचित्र प्रसंग घडतातप्रत्यक्षात चुकीची चिम्पाझी नेली जाते असे बरेच विचित्र प्रकार घडतात. आणि कदाचित हा सगळा प्रकार कुठे संपवावा हे लक्षात न आल्याने shrimp business भरभराटीला आल्याचं दाखवून पुस्तक विराम घेतं. वर म्हंटल्याप्रमाणे अमेरिकन इतिहास आणि समाजजीवन हा परीघ डोळ्यासमोर ठेवल्याने चित्रपट अधिक बांधीवरेखीव वाटतो मात्र पुस्तकाच्या बाबतीत हे घडत नाही. अर्थात हे पुस्तकही त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झालं होतं हेही तितकंच खरं.

दुसरं उदाहरण म्हणजे David Morrell च्या १९७२ साली प्रकाशित झालेल्या 'First Blood' या कादंबरीवर आधारित असलेला सिल्व्हेस्टर स्टॅलनचा १९८२ साली प्रदर्शित झालेला सुप्रसिद्ध आणि अमाप लोकप्रियता मिळवलेला त्याच नावाचा चित्रपट. "They drew the First Blood"  हा स्टॅलनचा तुफान गाजलेला संवाद माहित नसेल असा चित्ररसिक विरळाच. व्हिएतनाम युद्धातून परतून आलेल्यादेशाच्या नेतृत्वाने आपल्याला फसवलं अशी भावना असलेल्या अत्यंत निराश आणि आतल्या आत धुमसणाऱ्या एका निवृत्त सैनिकाची एका छोट्या शहराच्या पोलीस प्रमुखाशी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची होते आणि त्या ego clash मुळे पुढे घडणारा भयंकर संहार आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतो. चित्रपट अतिशय प्रवाही आहेवेगवान आहे. उत्कृष्ट संवाद आणि छायाचित्रण यांची जोरदार साथ दिग्दर्शक Ted Kotcheff ला लाभली आहे. रॅम्बो आणि पोलीसप्रमुख यांची पहिली भेटत्याची अटकपलायन हा सर्व भाग पुस्तकात अतिशय वेगाने घडतो आणि त्यामुळेच पुढे काय घडणार आहे हे माहित असूनही अतिशय उत्कंठाही निर्माण करतो. परंतु रॅम्बो जंगलात पळून गेल्यानंतरची वर्णनंपोलिसप्रमुखाचे संवादत्याची पार्श्वभूमीत्यांचं एकमेकांसमोर येणं हे एवढं संथ गतीने घडतं की चित्रपटातला वेग पुस्तकात कुठेच दिसत नाही. दरम्यानची वर्णनंघटनाही बऱ्यापैकी क्लिष्ट भाषेत (कदाचित त्याकाळच्या साहित्यिक मूल्यांना आणि नियमांना अनुसरून) असल्याने पुस्तक बऱ्यापैकी निराश करतं. निदान माझी तरी निराशा झाली. Morrell चं हे पुस्तक प्रचंड गाजलंअनेक विद्यापीठांमध्ये ते अभ्यासक्रमात लावण्यात आलं होतं हे पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या Morrell च्या मनोगतातून कळतं. पण तरीही पुस्तक काही मनाचा ठाव घेत नाही हे नक्की.


हे सगळं आठवण्याचं मुख्य कारण म्हणजे नुकताच बघितलेला The Black Phone हा चित्रपट. उत्तर डेनवर मधल्या एकदा छोट्या शहरातून १०-१२ या वयोगटातली मुलं गायब व्हायला लागतात. दरम्यान चित्रपटाचा नायक फिनी याच्यावरही दुर्दैवाने तीच वेळ येते. त्याला एका घराच्या तळघरात कोंडून ठेवलं जातं. तळघरात असलेल्या जुनाट फोनच्या (black phone च्या) मदतीने फिनी कशी सुटकेची धडपड करतो हे चित्रपटात पाहायला मिळतं. चित्रपट अतिशय गडद आहे. म्हणजे शाब्दिक आणि लाक्षणिक अशा दोन्ही प्रकारांनी. कारण निम्म्याहून अधिक चित्रपट अंधारात घडतो हे एक कारण झालंच. परंतु चित्रपटात वेळोवेळी भेटीस येणारे गडदकाळी छटा असणारे प्रसंगही चित्रपटाच्या भयप्रद वातावरणाला अजूनच काळोखी किनार बहाल करतात. कथानायकाच्या बहिणीला वेळोवेळी पडणारी गूढ स्वप्नंविकृत बापशाळेत दिला जाणारा त्रास या सर्व प्रसंगांमुळे तर चित्रपट अधिकच भयप्रद होतो.

हा चित्रपट Joe Hill या अमेरिकन लेखकाच्या त्याच नावाच्या एका लघुकथेवर आधारित आहे. चित्रपट बघून झाल्यावर फार उत्सुकतेने लघुकथा वाचली आणि फारच निराश झालो. चित्रपटाच्या मानाने ही लघुच नाही तर लघुत्तम कथा आहे. चित्रपटात दिसणारं गडदडार्क वातावरणवेगवेगळ्या गूढ प्रसंगांची पखरण पुस्तकात कुठेच दिसत नाही आणि असले तरी जेमतेम तोंडी लावण्यापुरतेच हे प्रसंग दिसतात. अंतिम संघर्षही चित्रपटात फारच तीव्र स्वरूपात मांडला आहे जो पुस्तकात मात्र अगदीच किरकोळी काढल्यासारखा वाटतो. त्यामुळे दिग्दर्शक Scott Derrickson बद्दलचा आदर अजूनच वाढतो.

या लघुकथेच्या निमित्ताने यापूर्वीही वाचनात आलेल्या लघुकथा आणि त्यांच्यावर आधारित अप्रतिम चित्रपट यांची आठवण झाली आणि या सर्वात एक साम्य लक्षात आलं की सुरुवातीला सांगितलेला नियम लघुकथांना लागू पडत नाही. कादंबऱ्या या नेहमीच त्यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटांपेक्षा उजव्या ठरत असतीलही (फोरेस्ट गम्प आणि फर्स्ट ब्लड हे निदान मला तरी जाणवलेले अपवाद वगळता)परंतु लघुकथांच्या बाबतीत मात्र हा नियम सपशेल उताणा पडतो. आपण ब्लॅक फोन व्यतिरिक्त अन्य काही लघुकथांचीही उदाहरणं पाहू.


२०१६ साली प्रदर्शित झालेला Arrival हा चित्रपट. Amy Adams आणि Jeremy Renner च्या अप्रतिम अभिनयाने नटलेला हा सायफाय/एलिअन्स प्रकारातला परंतु विचारगर्भ असा नो-नॉन्सेन्स चित्रपट. एलिअन्स प्रकारच्या चित्रपटांत नेहमी आढळणाऱ्या झगमगाटी प्रकाराला पूर्णतः फाटा दिलेला असल्यानेच कदाचित तो फार यश संपादन करू शकला नसावा परंतु परग्रहांवरील जीवांशी संवाद साधणे, भाषा, तंत्र विकसित करणे याबरोबरच चित्रपटात संपूर्ण वेळ प्रेक्षकांच्या सोबत वावरणारं परंतु स्वाभाविक कारणांमुळेच दिसू न शकणारं आणि अखेरच्या काही क्षणांत उघड होणारं रहस्य पाहून प्रेक्षकाला प्रचंड धक्का बसतो.

हा चित्रपट Ted Chiang च्या 'Story of Your Life and Others' या नावाच्या कथासंग्रहातल्या त्याच नावाच्या लघुकथेवर आधारित आहे. पुस्तकातही वर उल्लेखलेले प्रसंगघटनापरग्रहवासीत्यांना भाषा शिकवण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची खटपट करणारे भाषातज्ज्ञ आणि या साऱ्याबरोबर समांतर चालणारं आणि अखेरीस उघड होणारं रहस्य हे सगळं सगळं आहेच. परंतु तरीही चित्रपट जेवढा अवाक करतोमनाची पकड घेतो तितका परिणाम काही लघुकथा संपल्यावर वाटत  नाही. हे कदाचित दृश्य माध्यमाचं यश असावं असंही म्हणता येईल.

पुढची दोन उदाहरणं कदाचित धक्कादायक वाटण्याचा संभव आहे आणि त्यामुळे हे ही सांगायला हवं की या दोन उदाहरणांमध्ये उल्लेख होणारेच नव्हे तर या लेखात उल्लेख झालेले सगळे चित्रपट मी आधी बघितले आणि त्यानंतर ते ज्यावर आधारित आहेत ती पुस्तकं/लघुकथा/लघुकादंबऱ्या (novella) वाचल्या आणि त्यामुळे चित्रपटाने उभं केलेलं चित्र अधिक प्रभावी वाटून तुलनेने पुस्तकांचा प्रभाव पडला नसेल असं होण्याचीही शक्यता मला पूर्णपणे मान्यच आहे.

अत्यंत अभ्यासू आणि फिल्ममेकिंगचे विविध प्रयोग यशस्वीरीत्या करणाऱ्या दिग्दर्शक Christopher Nolan याचा Memento हा चित्रपट त्याचा भाऊ Jonathan Nolan याने लिहिलेल्या Memento Mori या लघुकथेवर आधारित आहे. अर्थात चित्रपटात बरेच बदल केलेले आहेत तसेच दोन निरनिराळ्या कालरेषांवर घडणारे प्रवास हे प्रत्यक्षात समोर घडताना पाहणं आणि तशी कल्पना करून वाचन करणं यात दृश्य माध्यमाला मिळणाऱ्या स्वाभाविक फायद्यामुळे चित्रपट हा लघुकथेपेक्षा अधिक उजवा आणि प्रेक्षणीय ठरतो हे नक्की.


पुढचं उदाहरणही असंच कदाचित न पटणारं आहे. पण अर्थात हे ही आहे की हा चित्रपट आणि तो ज्या

लघु-कादंबरी (novella) वर आधारित आहे ते दोन्ही त्याच तोलामोलाचे आहेत असं म्हंटल तर वावगं ठरू नये. ते म्हणजे अनेक दशकं लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर असणारा Shawshank Redemption हा चित्रपट आणि Stephen King या अमाप लोकप्रिय अशा अमेरिकन भयकथाकाराची Rita Hayworth and Shawshank Redemption ही लघु-कादंबरी. चित्रपट आणि कादंबरी हे जवळपास तोलामोलाचे असले तरी चित्रपटात सुरुवातीस येणारे काही करुण प्रसंगनिवेदक रेड आणि त्याच्या संबंधातले काही प्रसंग यामुळे चित्रपट कादंबरीपेक्षा किंचित उजवा वाटू शकतो.

अर्थात ही झाली मी वाचलेल्या आणि पाहिलेल्या कलाकृतींची उदाहरणं. अशी अजूनही अनेक उदाहरणं असतीलच किंवा ती वर मांडलेल्या मुद्द्याच्या विरुद्ध जाणारी किंवा थोडक्यात "पुस्तक हे चित्रपटापेक्षा श्रेष्ठ असतं" या सर्वमान्य नियमाचं पालन करणारीही असतील आणि त्यामुळेच त्यांचा या आपल्या आजच्या लेखात समावेश झाला नाही हे उघड आहे. आणि अर्थातच पुस्तक किंवा मूळ कलाकृती ही त्याच्या रूपांतरित आवृत्तीपेक्षा (चित्रपट/सिरीज) पेक्षा श्रेष्ठ असते हे सिद्ध करणारी बोकीलांच्या 'शाळापासून ते जॉन ग्रिशमडॅन ब्राऊनली चाईल्डमायकल कॉनली यांच्या पुस्तकांपर्यंतची 'Lost in Translation' ची असंख्य उदाहरणं आपणा सर्वांना माहित असतातच आणि त्यावर वेळोवेळी लेखन आणि चर्चा झालेल्या असल्याने या नियमाच्या विरुद्ध असणारी 'Gained in Translation' ची काही निवडक उदाहरणं नजरेस पडली म्हणूनच हा लेखनप्रपंच!

Thursday, March 24, 2022

अन्याय आणि हतबलतेची विस्मृतीत गेलेली कथा : काश्मीर फाईल्स

"इसे exodus नही genocide कहिए।"

(exodus :
एखाद्या समूहाचं पलायन/स्थलांतर, genocide : वंशविच्छेद)

'काश्मीर फाईल्स' सुरु झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच हा संवाद पहिल्यांदा कानावर येतो. ज्यात एक प्रकारचा क्रोध, घृणा ओतप्रोत भरलेली आहे असा हा संवाद त्यानंतर वेळोवेळी आपल्याला ऐकवला जातो. सुरुवातीला प्रेक्षकाला कदाचित प्रश्न पडू शकतो की नक्की काय आहे हे exodus आणि genocide आणि genocide च्या ऐवजी exodus वापरल्याने असा काय फरक पडणार आहे? चित्रपटाच्या सुरुवातीला पडलेला हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं हृदय पिळवटून टाकणारं वेदनादायक उत्तर यातला प्रवास म्हणजे 'काश्मीर फाईल्स' हा चित्रपट.

१९९०-९२
, २०१६ आणि सद्यकाळ अशा तीन कालरेषांवर (टाईमलाईन्स) हा चित्रपट घडतो आणि अरेखीय (नॉन-लिनिअर) पद्धतीने आपल्यापुढे सादर केला जातो. सचिन तेंडुलकर सारख्या भारताच्या लाडक्या सुपुत्राला इंडियन डॉग म्हणून हिणवून शिवीगाळ केली जाण्याचा प्रसंग हा चित्रपटाच्या सुरुवातीला बसणारा एक हलका अर्थात सॉफ्ट धक्का. त्यानंतर चित्रपटभर येऊ घातलेल्या अमानुष प्रसंगांच्या मालिकेसाठी प्रेक्षकाच्या मनाची बैठक तयार करण्यासाठी योजलेला एक छोटासा प्रसंग म्हणून याकडे पाहिलं जाऊ शकतं.

इस्लामी अत्याचार
, पाकिस्तान पुरस्कृत धर्मांध अतिरेकी यांना काही वर्षांपूर्वी हिंदी चित्रसृष्टीत पडोसी मुल्क अशा गोंडस नावाने संबोधण्याची पद्धत होती. अर्थात अलीकडच्या काही वर्षांत आलेल्या चित्रपटांमध्ये ही चौकट मोडण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी ती पूर्णतः मोडली जाईल असा प्रयत्न न करता सावधपणे पाऊल टाकण्याकडेच चित्रकर्त्यांचा कल असतो. 'काश्मीर फाईल्स' या सगळ्या सावध चौकटी मोडून, तोडून, विस्कटून, उखडून टाकून दूर भिरकावून देतो. चित्रपटात सावध मांडणी (किंवा subtlty) किंचितही आढळणार नाही. काश्मीर मधील इस्लामी अत्याचार, त्यातला पाकिस्तानचा हात, राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा ही आणि अशी काळी सत्य हा चित्रपट कोणाचीही भीडभाड न बाळगता उच्चरवाने आपल्यासमोर मांडतो. यातला हिंसाचार, क्रौर्य, सत्य हे इतकं हिडीस आणि क्रूर आहे की प्रेक्षकाला काही प्रसंगी वाटू शकतं की हे असे सगळे भयंकर प्रकार खरोखर घडले असतील का? आणि त्या सर्वांना एकाच छोट्याशा वाक्यात निरुत्तर करणारा संवाद आपल्या कानावर येऊन आदळतो. "कश्मीर का सच इतना सच है की वो झूठ लग सकता है"!!

विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या टीमने सुमारे ४ वर्षं अथक परिश्रम घेऊन, संशोधन करून, सरकारी कागदपत्रं, सरकारी अर्काईव्हज मधले व्हिडीओ बघून, हजारो काश्मीर विस्थापित आणि त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून चित्रपटाची मांडणी केली. यातले असंख्य अनुभव, त्यातलं भीषण क्रौर्य, अगणित अत्याचार, सामूहिक बलात्कार, सामूहिक हत्याकांडं, मुंडकी उडवणे, अवयव छाटणे यांसारख्या अत्यंत अमानुष घटनांनी भरलेले आहेत की ते चित्रपटात जसेच्या तसे दाखवणं हे शक्यच नसलं तरीही अगदीच subtle राहून त्यांची सौम्य मांडणी करणं हे ही सर्वस्वी अशक्य होतं. आणि त्यामुळेच या चित्रपटातील घटना आणि प्रामुख्याने संवाद हे अतिशय टोकदार आहेत. सद्यस्थितीला थेट भिडणारे आहेत. तत्कालीन निष्क्रिय राजकारणी आणि तथाकथित चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमं यांच्या दुतोंडीपणावर आसूड ओढणारे आहेत.

१९४६ मध्ये बंगालमध्ये ज्याप्रमाणे जिन्ना आणि सुऱ्हावर्दी यांनी मिळून
'डायरेक्ट अ‍ॅक्शन डे' घोषित करून मुस्लिमांद्वारे हिंदूंचं नृशंस हत्याकांड घडवून आणलं अगदी त्याच प्रकारे काश्मीरच्या खोऱ्यात तेथील मुस्लिम आणि पाक पुरस्कृत अतिरेकी यांच्या माध्यमातून अतिशय नियोजनबद्ध रीतीने १९-२०-२१ जानेवारी १९९० या तीन दिवसांत हिंदूंचा समूळ वंशविच्छेद केला गेला. १८ जानेवारीला तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी राजीनामा दिला आणि राज्यपाल जगमोहन यांची नियुक्ती होऊन ते तिथे पोहोचेपर्यंत सुमारे ३ दिवस राज्य निर्नायकी अवस्थेत होतं. १५ मिनिटं पोलीस हटवा आणि मग हिंदूंची अवस्था बघा अशा खुल्या धमक्या देणाऱ्या धर्मांधांच्या हातात ७२ तास एखाद राज्य मिळाल्यावर त्यांनी तेथील हिंदूंची काय अवस्था केली असेल याचा आपण विचारही करू शकत नाही.

"
रलीव (इस्लाम स्वीकारा), गलीव (मरा) या चलीव (पळून जा)" किंवा "अल सफा बट्टे दफा" (पंडितांनो काश्मीर सोडून जा) किंवा "काश्मीर बनेगा पाकिस्तान, पंडित औरतों के साथ पर पंडितोंके बगैर", "पंडितो, काश्मीर छोडो, लेकिन अपनी औरते छोड जाओ", "नारा ए तबलीग अल्ला हू अकबर" यांसारख्या महाभयंकर क्रूर, लाजिरवाण्या आणि हल्लेखोरांचा उद्देश पुरेसा स्पष्ट करणाऱ्या घोषणा जशाच्या तशा दाखवल्या आहेत. आणि त्याहून धक्कादायक म्हणजे अनेक प्रसंगांमध्ये या घोषणा लहान मुलांच्या तोंडी आलेल्या आहेत. साधारण याच अर्थाच्या घोषणा जेएनयुच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी दाखवताना चित्रकर्त्यांनी योग्य तो मुद्दा प्रेक्षकांच्या मनावर ठसेल याची पूर्ण खबरदारी घेतली आहे. काळ बदलला, व्यक्ती बदलल्या, परिस्थिती बदलली तरीही काश्मिरातली परिस्थिती, काश्मीरला भारतापासून मुक्ती देण्याची मागणी करणारी देशद्रोही मानसिकता ही आहे तशीच आहे हे सद्यस्थितीतील "तुकडे गॅंग" च्या घोषणा आणि १९९० मधल्या काश्मिरी अतिरेक्यांच्या घोषणा यांच्यातल्या साम्याद्वारे अधोरेखित होतं

(
जेएनयु) विद्यापीठाच्या भिंतींवर लेनिन, कार्ल मार्क्स यांची ठायीठायी दिसणारी चित्रं त्यांची वैचारिक दिशा स्पष्ट करतात. त्याचप्रमाणे भाईचारा, सच्चा मुसलमान वगैरे तुणतुणी न वाजवता आपल्याच मित्र आणि शेजारी बांधवांना पकडून देणारे काश्मिरी मुसलमान आणि त्यांना फूस लावणारे पाकिस्तानी मुसलमान हे ही जसे आहेत तसे थेट दाखवले जातात. काश्मीर मधील परिस्थिती चिघळत असतानाही ती आवरण्यासाठी काहीही न करणारे फारूक अब्दुल्लासारखे निर्लज्ज मुख्यमंत्री तसेच रेफ्युजी कॅम्पमधील भयंकर परिस्थिती पाहूनही तिकडे दुर्लक्ष करणारे मंत्री दिसतात आणि इस्लामी अतिरेक्यांना पाहून गर्भगळीत झालेले पोलीसही दाखवले जातात.

यातली अनेक पात्रं ही प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भेटीला येतात. २०-२५ पंडितांना निव्वळ हिंदू असल्याने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे असल्याने ठार मारलं याची ऑन स्क्रीन जाहीर कबुली देणारा बिट्टा कराटे आणि अनेक पंडितांच्या हत्याकांडात सहभागी असणारा, सातत्याने स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारा आणि तरीही भारताच्या तत्कालीन पंतप्रधांकडून भेटीचं आमंत्रण दिलं जाणारा आणि अनेक मीडिया हाऊसेसद्वारा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केला गेलेला देशद्रोही आणि इस्लामी अतिरेकी यासिन मलिक या दोन (आणि इतरही अनेक) अतिरेक्यांचं प्रातिनिधिक पात्र असलेला फारूक मलिक बिट्टा हा चिन्मय मांडलेकर यांनी अप्रतिम रंगवला आहे. अरुंधती रॉय, बरखा दत्त आणि अशा अनेक तथाकथित महिला विचारवंतांची प्रातिनिधिक भूमिका अर्थात प्रोफेसर राधिका मेननचं पात्र पल्लवी जोशी यांनी जिवंत केलं आहे. भयभीत काश्मिरी जनता, असहाय प्रशासन, नाकर्तं पोलीस खातं हे अनुक्रमे पुष्कर पंडित यांच्या भूमिकेत अनुपम खेर, आय ए एस ऑफिसर ब्रह्मदत्त अर्थात मिथुन चक्रवर्ती आणि डीजीपी अर्थात पुनीत इस्सर यांनी उत्कृष्टरित्या रेखाटल्या आहेत.

या सगळ्या ज्येष्ठांच्या मांदियाळीत तुलनेने नवीन आणि तरुण चेहरा असलेल्या दर्शन कुमार याने गोंधळलेला युवक ते विचारांची दिशा स्पष्ट झालेला तरुण कृष्णा पंडित उत्तम साकारला आहे. अर्थात त्याची
भूमिका ही स्टोरीबॅक्ड आहे. त्याला पडद्यावर वावरण्यासाठी मिळालेला वेळ, चित्रपटाच्या अखेरीस येणारं स्वगत कम भाषण हे चित्रपटाचं एक महत्वाचं बलस्थान आहे. काश्मीरचा प्राचीन इतिहास, तेथील विद्वान, त्यांचे निरनिराळ्या क्षेत्रातील असंख्य शोध, तेथील शैक्षणिक प्रगती, ज्ञानदान करणारी कैक विद्यापीठं, हजारो ग्रंथ आणि या सर्वांवर इस्लामी धर्मांध माथेफिरुंच्या टोळ्यांनी केलेली अगणित अमानुष आक्रमणं या साऱ्यासाऱ्याचा लेखाजोखा चित्रपटाच्या अखेरीस आपल्या भेटीस येतो.



या चित्रपटातील एक अतिशय महत्वाचं अंग म्हणजे छायाचित्रण. लॉंग शॉटद्वारे दाखवले जाणारे बर्फाच्छादित पार्श्वभूमीवरील अंधार
, स्फोट, मशिदींमधील घोषणा, हल्ले, खून आणि थोड्याच वेळात जणू काही झालंच नाही असा थंडगार प्रेताप्रमाणे पुन्हा दिसणारा बर्फाचा पांढरा रंग हा आपले राजकारणी आणि भारतातील उर्वरित राज्यांचा काश्मीर समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन याविषयी भाष्य करून जातो. त्याचप्रमाणे ट्रकमध्ये काश्मीरमधून पळून जात असताना पडद्यावर काळवंडलेलं आणि त्याचबरोबर झाडाच्या शेंड्यांनी झाकलेलं आकाश दिसतं आणि मुक्त आकाश अर्थात भयरहित भविष्य हे या काश्मिरी पंडितांसाठी किती अप्राप्य आहे, दिवास्वप्न आहे हे अधोरेखित केलं जातं. त्याचप्रमाणे पुष्करनाथ पंडित यांची भूमिका करणाऱ्या अनुपम खेर यांच्या महादेवाप्रमाणे निळ्या रंगात रंगवलेल्या परंतु अत्यंत भयभीत आणि दयनीय अवस्थेतल्या चेहऱ्याच्या क्लोजअपला चित्रपटाच्या पोस्टरवर आणि प्रमोशन्स/ट्रेलर्स मध्ये आवर्जून स्थान देणे ही देखील एक अतिशय विचारपूर्वक घेतलेली भूमिका आहे. आपला सनातन धर्म आणि देवदेवतांवर ओढवलेलं एक महासंकट या स्वरूपात प्रेक्षक चटकन त्या समस्येशी जोडले जातात.

चित्रपटात ठायीठायी पेरलेली काश्मिरी लोकगीतं ही चित्रपटाची भूमिका आणि  काश्मीरी पंडितांची असहाय उद्विग्नता मांडण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची भूमिका निभावतात. पुष्कर पंडितांच्या तोंडी येणारी त्याचप्रमाणे अनेकदा बॅकग्राऊंडला ऐकू येणारी काश्मीरी लोकगीतं ही काश्मिरी विस्थापितांची काश्मिरातल्या आपल्या स्वतःच्या घरी परतण्याची अतीव इच्छा परंतु ते शक्य नसल्याने येणारी अगतिकता
, हतबलता मांडून प्रेक्षकांना अक्षरशः घायाळ करतात.

वर म्हंटल्याप्रमाणे चित्रपटाची मांडणी थेट आहे. धोरणी किंवा ताकाला जाऊन भांडं लपवणारी नाही. ही मांडणी जागोजागी भेटणाऱ्या संवादांमधूनही दिसते. यात "चौथा स्तंभ अर्थात पत्रकारितेला राजकारण्यांची रखेल म्हंटलं जातं"
, शेख अब्दुल्लाच्या सरड्याप्रमाणे रंग बदलण्याच्या प्रवृत्तीवर आणि बदलत्या भौगोलिक स्थानानुसार (दिल्ली, जम्मू, काश्मीर) कम्युनिस्ट, कम्युनलिस्ट, नॅशनलिस्ट आणि सेक्युलरिस्ट अशी विविध रूपं साकारण्यावर ताशेरे ओढले जातात. प्रोफेसर राधिका मेनन आणि वैचारिक गोंधळ असणारा विद्यार्थी कृष्णा यांच्यातले अनेक संवाद तर कमाल जमून आले आहेत. काश्मिरींवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारासंदर्भात निषेध व्यक्त करताना कृष्णा त्याला पिळवणूक म्हणतो तर प्रोफेसर राधिका मेनन त्याला निर्लज्जपणे समजावते की "अरे ही पिळवणूक नाही, हे राजकारण आहे". त्याचबरोबर प्रोफेसर राधिकाच्या "सत्ता त्यांची असली तरी (इको) सिस्टम आपली आहे", "आपल्याला उपाय द्यायचेच नाहीयेत, आपल्याला फक्त 'आशा' दाखवायची आहे की उपाय आहेत" यासारख्या धूर्त संवादांतून काश्मीर प्रश्न भडकवत ठेवू इच्छिणाऱ्या देशद्रोही विचारांचं शहरी नक्षलींच्या विचारांशी असणारं साम्य चतुराईने अधोरेखित केलं जातं.

काश्मीरमध्ये पंडितांवर झालेलय कैक हल्ल्यांचे आणि हत्याकांडाचे उल्लेख चित्रपटात येतात. पण त्यांचा उल्लेख इतक्या कमी वेळेपुरता होतो की त्याबद्दल अजून माहिती दाखवली जायला हवी होती असं आपल्याला वाटून जातं. अर्थात सुमारे तेराव्या शतकापासून होणारी माथेफिरू इस्लामी आक्रमणं अडीच तीन तासांत दाखवणं काम नक्कीच अवघड आहे. (अशा वेळी मनात सहज विचार डोकावून जातो की काश्मीर फाईल्सवर सिरीज यायला हवी ज्यात चित्रपटात वेळेअभावी दाखवायचे राहून गेलेले अनेक प्रसंग तपशीलवार मांडता येतील.). चित्रपटात दाखवताना प्रत्यक्षात घडलेल्या अनेक प्रसंगांमधील काही निवडक प्रसंग आणि पात्रं यांचं एकत्रीकरण करून ते आपल्यासमोर मांडले आहेत. चित्रपटात
'बट्टा मझार' (ब्राह्मणांची स्मशानभूमी) या सुमारे चौदाव्या शतकात झालेल्या पंडितांच्या नृशंस हत्याकांडाचा धावत उल्लेख येतो. सिकंदर बुतशिकन या अत्याचारी इस्लामी राज्यकर्त्याने काश्मीरमधील सुमारे लाखभर पंडितांसमोर दोनच पर्याय ठेवले एक म्हणजे जानवी तोडा (धर्म बदला) अथवा मृत्याला सामोरे जा. सर्व पंडित धैर्याने मृत्याला सामोरे गेले. त्यांना डाल लेक मध्ये बुडवून मारण्यात आलं आणि या घटनेनंतर त्यांच्या तोडलेल्या जानव्यांचा ढीग करण्यात आला ज्याचं वजन सुमारे सदतीस किलो भरलं. चित्रपटाच्या अखेरीस अगदी अलीकडे म्हणजे २००३ मध्ये झालेला नदीमार्ग हत्याकांडाचा प्रसंग तपशीलवार येतोच आणि त्याचबरोबर काश्मीरमधील गरीब शालेय शिक्षिका गिरीजा टिक्कूवर ओढवलेले नृशंस अत्याचारही दाखवले जातात. अर्थात प्रत्यक्षात झालेले अत्याचार, हिंसाचार, बलात्कार, हत्याकांड यांची अमानुषता इतकी भयंकर आहे की ते जसेच्या तसे दाखवले असते तर चित्रपटावर उथळ आणि बटबटीतपणाचे शिक्के लागले असते. त्यामुळे थेट प्रसंग दाखवण्याचा मोह टाळून ते किंचित सौम्य करून दाखवण्याचा दिग्दर्शकाचा निर्णय अतिशय योग्यच म्हंटला पाहिजे.

चित्रपटाच्या पूर्वार्धात अनेकदा येणारा "इसे
exodus नही genocide कहिए" हा संवाद उत्तरार्धात जवळपास नाहीसा होतो. पण तो तसा संवाद का असतो, त्याचा अर्थ काय हे सुरुवातीला स्पष्टपणे समजावून सांगितलं जात नाही. पण आता शेवटाकडे त्या संवादाची गरज अर्थातच उरलेली नसते आणि तो समजावून सांगण्याचीही. कारण उरला असतो तो फक्त दाटल्या गळ्यांनी, भरल्या डोळ्यांनी आणि दाबल्या हुंदक्यांनी व्यापलेला अवकाश!


-हेरंब ओक