Monday, May 6, 2024

लापता बेगम्स


साधारण तीनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळी चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली होती. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि संवाद या प्रमुख बाजू भक्कम असलेल्या चित्रपटांमध्ये साधारणतः खोट काढण्यासारखं काहीही उरत नाही आणि त्याची आवश्यकताही नसते. किचन मध्ये या तिन्ही प्रमुख गोष्टी फार सशक्त आहेत आणि त्यामुळेच मलाही तो चित्रपट आवडला होता. मात्र माझा एक प्रमुख आक्षेप हा त्या चित्रपटाच्या शीर्षकावर होता. त्या चित्रपटाने विनाकारण आणलेला वैश्विक प्रतिनिधित्वाचा आव मला चांगलाच खटकला होता. तो चित्रपट म्हणजे कुठल्याही अंगाने समस्त भारतीय स्वयंपाकघरांचं (आणि कुटुंबव्यवस्था, पती-पत्नी नातेसंबंध इत्यादींचं) प्रतिनिधित्व करणारा खचितच नव्हता. माझ्या मते ती केरळमधल्या एका अतिसामान्य खेडेगावातल्या एका बौद्धिक आणि वैचारिक दृष्ट्या अत्यंत बुरसटलेल्या कुटुंबाची कथा होती. शीर्षकात वापरण्यात आलेलं 'ग्रेट' हा शब्द उपरोधाने आलेला आहे हे माहिती होतं आणि मान्यही होतं. त्यामुळे माझ्या मते त्या चित्रपटाचं योग्य शीर्षक फार तर 'The great Kerala village kitchen' असं काहीतरी असायला हवं होतं.

तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या, आवडलेल्या एका मल्याळी चित्रपटासाठी एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला आणि चर्चेत आलेला 'लापता लेडीज'. लापता देखील तांत्रिक दृष्ट्या अतिशय सशक्त आहे. वर उल्लेखलेल्या कथा, दिग्दर्शन आणि संवाद यांच्या बरोबरीनेच छायाचित्रण, संगीत या आणि अशा इतरही अनेक बारीकसारीक घटकांवर काम केलं आहे हे जाणवतं. पण किचन निदान नुसताच शीर्षकात फसलेला होता परंतु लेडीज तर संकल्पनेतच फसलेला आहे. बुरखा/नकाब/हिजाब हे प्रकार ज्या धर्माच्या प्राथमिक बाबींपैकी एक अतिशय महत्वाची ओळख आहे, त्या धर्माला केंद्रस्थानी न ठेवता (बुरख्याचा धाकटा भाऊ असलेला) घुंघट हा प्रकार ज्या धर्मात, समाजात अनिवार्य नाहीये त्याला केंद्रस्थानी ठेवण्याची ही चित्रकर्त्यांची अपरिहार्यता आहे की खोडसाळपणा की दोन्ही हे लक्षात न आल्याने लिहायला बसलो. ज्या धर्मात बुरख्याच्या समस्येसोबतच समाजातलं स्थान, शिक्षण, कुटुंबव्यवस्था या सर्वच बाबीत स्त्रियांना अधिकृत धर्माज्ञेनुसारच दुय्य्म स्थान आहे त्या धर्माला उघडपणे आरोपीच्या चौकटीत उभं करून प्रश्न विचारण्याचं धाडस चित्रकर्त्यांना का होत नसेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सर्वांनाच ठाऊक असलं तरी ते उत्तर बरोबर नाही हे ही तितकंच खरं.

 चित्रपट आवडला असूनही चित्रपटाचा मूळ गाभा, संकल्पना न पटल्याने आणि त्यामागे चित्रकर्त्यांचा उद्देश प्रामाणिक नसल्याची खात्री असल्याने  (आणि ही खात्री त्यांच्या पूर्वेतिहासामुळे आहे.) थोडं तिरकस प्रकारे लिहून या खटकलेल्या गोष्टीचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट मला आवडला आहे हे पुन्हा एकदा यासाठी सांगतोय की तो कसा चांगला आहे आणि मला कसा कळला नाहीये अशा प्रतिक्रिया न आल्यास शक्यतो उत्तम. पण आल्या तरी मी प्रतिवाद करणार नाही हे ही तितकंच खरं.

------------------------------
लापता बेगम्स
------------------------------

सरत्या दिवसानिशी घुंघटधारी सनातन समाजाचा जगभरात वाढत चाललेला दहशतवाद, सनातन धर्माच्या पाईकांकडून धर्मांध अट्टहासापायी वेळोवेळी घडवण्यात येणाऱ्या दंगली, सनातन धर्माद्वारे केले जाणारे अत्याचार, हत्याकांडं, सनातन धर्मात असणारं स्त्रीचं दुय्यम स्थान, दिले जाणारे तोंडी घटस्फोट, घरगुती हिंसा, देवाब्राह्मणांच्या आणि अग्नीच्या साक्षीने पुरुषाला चार पत्नी करण्याची देण्यात आलेली अधिकृत मुभा या आणि अशा असंख्य अन्यायकारक चालीरीतींविरुद्ध आवाज उठवणं ही काळाची गरज आहे हे कुठलाही सजग नागरिक मान्य करेल. परंतु हाच आवाज उठवत असताना सनातन धर्माज्ञांना विरोध दर्शवला म्हणून, आकाशातून आलेल्या सनातन ग्रंथाच्या आणि एकमेव सनातन देवाच्या विरुद्ध विधानं केली म्हणून सनातन धार्मिक ग्रंथाच्या आधारे दिल्या जाणाऱ्या शिरच्छेदाच्या शिक्षेचीही तितकीच भीती चित्रपट निर्मात्याला वाटत असणे यातही काहीच चूक नाही.

सनातन धर्मात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा तर द्यायचा आहे परंतु जीवही प्यारा आहे अशा घालमेलीत सापडलेले असताना एका एकमेव अशा शांतीप्रिय धर्माचा आधार घेऊन, त्या मूळच्या अत्यंत शांतीप्रिय धर्मावर सगळे दोषारोप करून चित्रनिर्मिती करणे हे सर्वात सुरक्षित, उमदं आणि तितकंच चतुर आणि चाणाक्ष असं पाऊल आहे याबद्दलही दुमत नसावं. कारण शांतीप्रिय धर्माचे पाईक कधीच कुठल्याही गोष्टीच्या विरोधात मोर्चा नेत नाहीत, संप करत नाहीत की साधा निषेधही नोंदवत नाहीत. हे सगळे प्रकार हे फक्त आणि फक्त सनातनी धर्माच्या अखत्यारीतले आहेत. आणि हेच योग्य प्रकारे ओळखून, सनातन धर्मातल्या अनिष्ट चालीरीतींचा विरोध करण्यासाठी शांतीप्रिय धर्माला लक्ष्य करून त्याच्या पाईकांवर टीका करणं हे सगळ्यात साधंसोपं हत्यार आहे. आणि याच हत्याराचा अचूक वापर करत अतिशय हुशार चित्रकर्त्यांनी 'बनवलेला' तितकाच हुशार चित्रपट अर्थात 'लापता बेगम' प्रेक्षकांच्या भेटीस येतो.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच एकसारखे तंबू परिधान केलेल्या स्त्रिया आणि एकसारखे लांब सदरे आणि तोकड्या विजारी घातलेले पुरुष अशा तीन-चार नवविवाहित जोडप्यांचं दर्शन प्रेक्षकांना घडतं. पण थोड्याच वेळात त्यातलीच एक बंडखोर बेगम आपल्या भेटीस येते. स्त्री म्हणजे अपत्य जन्माला घालणारी शेती अशी धर्ममान्यता असलेल्या सनातन धर्मातल्या एका बंडखोर स्त्रीला चक्क बोलताना, स्वतःचं मत व्यक्त करताना, इतरांच्या चुकीच्या मतांना विरोध करताना, आणि शेवटी तर स्वतःच्याच खुद्द खाविंदांचं नाव उच्चारताना बघून पडद्यावरचे धर्ममार्तंड जेवढे हादरतात तेवढेच समोर बसलेले शांतिप्रय प्रेक्षकही.

हिणकस, निद्रिस्त, मागासलेल्या, अन्यायकारक, स्त्रीद्वेष्ट्या, पोथीवादी, पुराणमतवादी, दहशतवादी अशा सनातन धर्माच्या दहशतीपायी त्या धर्मातल्या अन्यायकारक रूढींवर जीवाच्या भीतीने टीका करता येत नसल्याने सर्व प्रकारची टीका करण्यासाठी सर्वसमावेशक, सेक्युलर, उदारमतवादी, मुक्त विचारांच्या, आधुनिक अशा एकेश्वर पंथाची निवड करून चित्रकर्त्यांनी एकूणच अन्यायकारी परिस्थितीवर अतिशय अप्रतिम भाष्य केलं आहे.

एका प्रसंगात सनातनी सम्राटांच्या अतिरेकी धर्मांध प्रेमापोटी त्यांनी वाळवंटी शांतीप्रिय एकेश्वरवादी पंथाकडून बळाने जिंकलेल्या शहरांची मूळ प्राचीन नावं बदलून त्यांना सनातनी धर्माशी सुसंगत अशी नावं देण्याच्या अट्टहासावरही चांगलेच कोरडे ओढले आहेत तर अन्य एका प्रसंगात स्त्रियांना शिकू न देण्याच्या, त्यांना नोकरी व्यवसाय करण्यास मनाई करण्याच्या, चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकला स्थापत्य इत्यादी गोष्टींना निषिद्ध मानणाऱ्या सनातन धर्मातील तालिबामणी प्रथेवरही अचूक कोरडे ओढले आहेत.

अर्थात ही सारी टीका शांतीप्रिय समाजाबद्दल दाखवली गेली असली तरी मूळ रोख सनातन धर्मावर आहे हे सुजाण प्रेक्षक सहजच ओळखतो. परंतु सनातन धर्माच्या अतिरेकी, धर्मांध दहशतवादाच्या भीतीने ते प्रत्यक्षात दाखवता आलं नाही तरी अशा subtle पद्धतीने दाखवल्याबद्दल चित्रनिर्मात्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. पावलोपावली अन्याय होत असूनही त्याविरुद्ध लढा देणं तर सोडाच पण निषेधाचा साधा शब्दही उच्चारता येत नसलेल्या एका शांतीप्रिय समाजाचा दबका आवाज प्रेक्षकांसमोर अतिशय मार्मिक पद्धतीने आणल्याबद्दल हा समाज चतुर आणि चाणाक्ष असे चित्रकर्ते अमीर कुलकर्णी आणि किरण देशपांडे यांच्याप्रती आजन्म उपकृत राहील याची आम्हास खात्री आहे.

--हेरंब ओक

No comments:

Post a Comment