Saturday, October 20, 2018

गहिरा अंधार आणि अमर्याद पाऊस : तुंबाड !


“‘तुंबाड’ हा सर्वोत्कृष्ट भयपट आहे का?” या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला एक पाऊल मागे सरकून “‘तुंबाड’ हा भयपट आहे का?” या प्रश्नापासून सुरुवात करावी लागेल. किंवा मग “चार-दोन दचकवणारे प्रसंग असलेला चित्रपट म्हणजे भयपट असतो का?” किंवा “भरपूर अंधार असलेला, वेगवान घटना घडणारा आणि अधेमध्ये जरा घाबरवणारा चित्रपट म्हणजे भयपट असतो का?” अशा प्रकारचे प्रतिप्रश्न करावे लागतील. (नारायण धारपांच्या कथांवर आधारित असल्याने कदाचित त्याला सरळ भयपट हे विशेषण लागलं असावं हा अजून एक मुद्दा.) कारण या न्यायाने तुंबाड कदाचित भयपट होऊही शकेल. कारण गूढ गहिरा अंधार आणि सतत कोसळणारा अमर्याद पाऊस हे तुंबाडचे दोन अत्यंत महत्वाचे नायक आहेत. कारण ते अतिशय रूपकात्मक पद्धतीने निर्लज्ज पाप आणि कधीही न संपणारी लालसा/हाव यांचं प्रतिनिधित्व करणारे म्हणून वापरण्यात आले आहेत. जवळपास प्रत्येक प्रसंगात अंधार किंवा पाऊस आहेच आणि  कित्येकदा दोन्हीही आहेत. तसं पाहता तुंबाडमध्ये अनेक रूपकं वापरली आहेत.  गाभा, मूळ, लालसा, वासनांधता, हाव, शाप आणि पराजय या सगळ्या सगळ्यासाठी !!

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या साधारण ३०-३५ वर्षांत ३-४ पिढ्यांमध्ये ही कथा घडते. आर्थिक असमानता, सामाजिक अन्याय, पूर्वजांपासून चालत आलेला शाप, लाचार गरिबी, अंधश्रद्धा, हाव, लोककथा, आद्यकथांमधले संदर्भ ,लालसेपायी शापाला ठोकर मारून आणि अनेकदा कोणत्याही मार्गाचा वापर करून अधिकाधिक श्रीमंत होण्याची धडपड या सगळ्यांना स्पर्श करत आणि सामावून घेत तुंबाडची कथा मार्गक्रमणा करत जाते. वर सांगितलेल्या दोन नायकांएवढाच किंवा त्यापेक्षाही महत्वाचा असणारा तुल्यबळ महानायक म्हणजे तुंबाड ची दृश्यात्मक परिणामकारकता. एकेका दृश्याची चौकट (फ्रेम) अत्यंत मेहनत घेऊन, कथेच्या बाजाला आणि प्रकृतीला न्याय देईल अशा तऱ्हेने मांडण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ उभा करताना तेव्हाची घरं, वाहनं, प्रसंग, लोकांच्या आवडीनिवडी, सवयी अतिशय कल्पकतेने निवडून खऱ्या वाटतील अशा रीतीने उभ्या केल्या आहेत. घर, वाडा, बोळ, अंगण अशा सामान्य स्थळी घडणारे साधे प्रसंग अंधार, पाऊस आणि गूढ वातावरण याने अपेक्षेपेक्षा अधिक भयप्रद होतील अशा रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रत्येक फ्रेममध्ये खास गडद टच देऊन चित्रपटाची गूढ प्रवृत्ती मेन्टेन्ड राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिलं गेलं आहे. यासाठी उच्च दर्जाच्या छायाचित्रणाबद्दल सिनेमॅटोग्राफर पंकज कुमारचं विशेष कौतुक केलं पाहिजे. हे सगळं होत असताना चित्रपटाचा स्वतःचा पहिल्या क्षणापासून असणारा वेग हा शेवटच्या प्रसंगापर्यंत अबाधित राहिल याची कटाक्षाने दक्षता घेण्यात आली आहे.

 वर म्हंटल्याप्रमाणे हा लौकिकार्थाने भयपट न वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे हा चित्रपट तत्सम प्रसंगांमधील सुरुवातीचे काही क्षण वगळता “बंद दारामागच्या खोलीत किंवा तळघरात काय आहे?” याबाबतचा कल्पनाविलास प्रेक्षकांना करू देत नाही. कारण सुरुवातीला काही वेळ भीतीदायक (काही प्रसंगी विनोदीही) आवाज ऐकवून काही क्षणातच तिथल्या प्रत्यक्ष अस्तित्वाचं आपल्याला पूर्ण दर्शन घडवतो. चित्रविचित्र आवाज ऐकवून, अचानक भुताला/आत्म्याला/पिशाच्चाला सामोरं उभं करून प्रेक्षकांना घाबरवून सोडणे हा या चित्रपटाचा उद्देश खचितच नाहीये. याउलट या अनुषंगाने येणाऱ्या मानवी भावभावना अधिकाधिक उच्च आणि गडद चित्रशैली वापरून मांडण्याला दिग्दर्शक अधिक महत्व देतो. लोभ, कुमार्ग, अविवेकीपणा, गैरमार्गाने मिळवलेलं धन, रंगेलपणा आणि या सगळ्यातून उत्पन्न झालेली अजून हाव असं हे एक पूर्णचक्र आहे. स्वतःच्या डोळ्यादेखत घडत असलेल्या चक्रात पुढची पिढी विनासायास न अडकली तरच नवल !

तुंबाड अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळतो किंवा त्यात सुस्पष्टता नाही. पण तो दिग्दर्शनातला ढिसाळपणा नसून मुद्दाम आणलेला धूसरपणा आहे. अशा प्रकारच्या गूढ चित्रपटांमध्ये काही जागा मुद्दाम मोकळ्या सोडून प्रेक्षकांच्या आकलनशक्ती आणि विचारक्षमतेला आव्हान देण्याचे प्रयत्न हुशार/प्रयोगशील दिग्दर्शक करत असतात. हा त्यातला प्रयत्न आहे. एखादा मुद्दा/प्रश्न पडद्यावर मांडला पण त्याचं उत्तर स्वतः दिग्दर्शक/लेखकाकडेचं नाहीये आणि त्यामुळे तो सोडून दिला अशा प्रकारच्या घिसाडघाईतून आलेला हा अर्धवटपणा नाही. तर अपूर्णतेतून निर्माण झालेल्या अनेक शक्यता मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

चित्रपट पाहताना राहून राहून मनात येत राहिलेला मुद्दा म्हणजे हा चित्रपट हिंदी ऐवजी मराठीत का केला गेला नाही? कोकणातल्या ब्राह्मण कुटुंबातली केशवपन केलेली स्त्री स्वतःच्या १०-१२ वर्षांच्या मुलांशी हिंदी बोलताना ऐकून फारच विनोदी वाटतं. किंवा अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पुण्यातही पुणेरी पाटी दाखवल्याबद्दल दिग्दर्शकाच्या तपशीलाबद्दल आग्रही असण्याचं आणि विनोदबुद्धीचं कौतुक वाटतंच मात्र त्याच वेळी ती पुणेरी पाटी हिंदीत बघून नक्कीच दाताखाली खडा आल्याचा भासही होतो. अगदी सहजतेने उपशीर्षकं (सबटायटल्स) पुरवता येण्याच्या काळात हे करता येणं सहज शक्य होतं. अर्थात अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी किंवा मराठी चित्रपटांच्या तिकीटाच्या किंमती वगैरे आर्थिक कारणांमुळे हे करता आलं नसेल असं मानायला जागा आहे.

चित्रपटात सुरुवातीला दिसणाऱ्या हस्तरच्या मूर्तीमधून मनात तयार होणारी हस्तरची प्रतिमा आणि कालांतराने दिसणारा हस्तर (आणि त्याची प्रतिरूपं) यात अतिप्रचंड तफावत आहे. तसंच भारतीय वंशाच्या/वळणाच्या पुराणकथेत उल्लेखलेला हस्तर आणि प्रत्यक्षात दिसणारा ममीसदृश अभारतीय हस्तर हा ही पचायला थोडा कठीण जातो हे ही नक्की.

तुंबाड आणि त्याच्या अप्रतिम दिग्दर्शन, छायांकन, वातावरण निर्मिती इ० बद्दल बोलून झाल्यावर संभाषणाची गाडी आपोआपच दिग्दर्शक राही अनिल बर्वेचा संघर्ष यावर येऊन ठेपते. चित्रपट अतिशय अप्रतिम आहेच पण तो खरोखरच त्या दर्जाचा आहे म्हणून. दिग्दर्शकाच्या अविरत आणि लांबलचक संघर्षामुळे तो ग्रेट आहे असं म्हणण्याची आवश्यकता नाही. उलट असं म्हणणं म्हणजे राहीच्या अप्रतिम दिग्दर्शनकौशल्यावर केलेला अन्याय आहे. दुर्दैवाने एखाद्या चित्रपटाच्या नशिबी अन्यांपेक्षा अधिक संघर्ष असतो एवढाच त्याचा अर्थ घेतला जावा. त्यामुळे तुंबाड अगदी आवर्जून आवर्जून बघायलाच हवा पण तो फक्त दिग्दर्शकाने केलेल्या संघर्षाला न्याय देण्यासाठी म्हणून नव्हे तर उत्तम निर्मितीमूल्य, दिग्दर्शन, छायाचित्रण, कथा/पटकथा असलेला हा चित्रपट त्या योग्यतेचा आहे म्हणून !!

Sunday, October 14, 2018

कोरिअन सूडपटाच्या वळणाने जाणारी 'आज्जी'



अनेकदा चित्रपटांची पोस्टर्स फार बोलकी असतात. एका छोट्याश्या चित्रात संपूर्ण चित्रपटाचा पोत मांडणारी, एक वातावरण निर्मिती करणारी किंवा प्रेक्षकाला समोर काय बघायला मिळणार आहे याचं निमिषार्धात वर्णन करणारी. ‘आज्जी’ चित्रपटाचं पोस्टर अगदी असंच आहे. पण अगदी मिनिमलीस्टीक. एक प्लेन काळाकुट्ट चेहरा, भेदक डोळे आणि भडक कुंकू. बास. एवढंच.

ही एक सूडकथा आहे परंतु आपण नेहमी पाहतो तशी नव्हे. थोडी वेगळी. बऱ्यापैकी कोरिअन सुडकथांच्या वळणाने जाणारी. कसंबसं हातातोंडाची गाठ पाडू शकणाऱ्या एका निम्नआर्थिक स्तरातल्या चौकोनी कुटुंबावर एका काळरात्री अचानक एक मोठा आघात होतो. अर्थात सुरुवातीला साधा वाटणारा आघात थोड्याच वेळात मोठं रूप धारण करतो. पटत नसलं तरी गरिबीपायी तोंड बंद ठेवून अन्याय सहन करण्यावाचून कुठलाही पर्याय नसल्याचं कुटुंबाच्या लवकरच लक्षात येतं. मात्र आज्जीला हे मान्य नसतं. थोडेफार प्रयत्न करूनही काहीच हाती लागत नसल्याचं पाहून आज्जी मनोमन काहीतरी ठरवून तिच्या कामाला लागते. थोडीथोडी माहिती गोळा करत, लोकांना भेटत, त्यांचे उपकार शिरावर बाळगत, एकेक पायरी वर चढत ती हळूहळू आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने मार्गक्रमणा करत जाते आणि अंतिमतः सूडाला परिणाम देते आणि मगच विराम घेते. मात्र हे सारं घडतं अतिशय संथपणे. पायरीपायरीने. अत्यंत मर्यादित संवादांच्या माध्यमातून. तसं पाहता कथेचा जीव एखाद्या शॉर्टफिल्म एवढा आहे. परंतु थोडे अधिक (कधी कधी अनावश्यकही) तपशील पुरवत कथेचा जीव वाढवल्याचा भास काही प्रसंगी होतो.

बऱ्यापैकी मंद गतीने पुढे सरकणाऱ्या या चित्रपटातल्या काही प्रसंगांतला बटबटीतपणा, रक्तपात हा प्रचंड धक्कादायक आहे. किमान हिंदीत तरी यापूर्वी कधीच न दाखवला गेलेला असा. काही निवडक प्रसंग खूपच भडक आहेत. म्हणजे दृश्यात्मक रीत्या फारच बोल्ड म्हणता येतील असे, वे टू ग्राफिकल, अंगावर येतील असे. वर कोरिअन सूडपटांचा उल्लेख केला तो निव्वळ याचसाठी. पण असे काही प्रसंग सोडता बाकी अन्य वेळ चित्रपट त्याच्या नॉर्मल संथ गतीत जात राहतो. बोलकं पोस्टर असा उल्लेख आला तो या अनुषंगाने. एक भडक कुंकू वगळता बाकी एकदम प्लेन काळाकुट्ट. चित्रपटाचा अधिकतम भाग हा रात्रीच्या अंधारात घडतो. परंतु यातले प्रसंग रात्रीच्या अंधारात अस्पष्ट घडताहेत असे दाखवलेले नाहीत. उलट काळरात्रीचा आणि पुढल्याही प्रत्येक रात्रीचा भीषण गडदपणा अंगावर येईल, घुसमट जाणवेल अशा सुस्पष्ट, ठसठशीत काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घटना घडत जाते.

आपल्याकडे असणाऱ्या अत्यंत अत्यंत मर्यादित स्रोतांचा (रिसोर्सेस) वापर करत, दुखण्यांवर मात देत आज्जीने शेवटाकडे एका मोठ्या घटनेला परिणाम देणं हे वाखाणण्याजोगं आहे आणि सुषमा देशपांडेंनी ते फारच प्रभावीपणे पार पाडलं आहे. अतिशय कमी संवादांमध्ये देहबोलीचा प्रभावी वापर करत त्यांनी आज्जी अगदी जिवंत केली आहे. विकास कुमारचा लाचार आणि स्वार्थी इन्स्पेक्टर तसंच अभिषेक बॅनर्जीचा विक्षिप्त/विकृत 'धावले' अतिशय परिणामकारक झाले आहेत. पण सर्वात महत्वाचा म्हणजे कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन सबकुछ असलेला देवाशीष मखीजा. भारतीय चित्रपटात इतके हिंस्र किंवा विकृत वाटावेत इतपत भडक प्रसंगांची मांडणी आणि चित्रीकरण करणं हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि ते मखीजाने लीलया पेललं आहे हे निश्चित.

कुठलाही चित्रपट परिपूर्ण नसतो त्याप्रमाणे ‘आज्जी’ ही नाहीच. निम्न आर्थिक आणि सामाजिक स्तरातल्या पात्रांकडून “हेल्प, फील, ऑप्शन” सारख्या सफाईदार इंग्रजी शब्दांची पेरणी खटकणारी आहे. तसंच काही अपवाद वगळता जवळपास प्रत्येक पात्र मराठीत असूनही सगळे संवाद मात्र हिंदीत आहेत. निदान तोंडदेखलंही मराठी वापरण्याची सूचकता दिग्दर्शकाला दाखवता आली नाही हे नक्कीच पटत नाही. परंतु एकूण चित्रपटाच्या तुलनेत हे दोष अगदीच दुर्लक्ष करण्याजोगे आहेत.

हा चित्रपट ‘मस्ट वॉच’ आहे का? तर भडक, बोल्ड मांडणी, रक्तपात यांचं वावडं असणाऱ्यांसाठी नक्कीच नाही. देशोदेशीच्या सूडपटांचे नियमित प्रेक्षक असलेल्यांसाठीही कदाचित नाही. परंतु हिंदीत सूडपटाचा एक नवीन वेगळा प्रयत्न म्हणून ज्यांना एक अनुभव घ्यायची इच्छा आहे त्या सर्वांसाठी मात्र निश्चितच !!

Friday, October 5, 2018

डोळसपणे पाहण्याचा अंधाधून


निव्वळ स्वतःच्या नावावर प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्याचं कसब सध्याच्या ज्या दिग्दर्शकांमध्ये आहे त्यात जेमतेम चारेक (आणि हा पाचवा) चित्रपट नावावर असणाऱ्या श्रीराम राघवनचं नाव नक्कीच फार वरचं आहे आणि कदाचित एखादा अपवाद वगळता जवळपास एकाही चित्रपटात राघवन प्रेक्षकांना निराश करत नाही. राघवनचा प्रमुख भर असतो तो ट्रीटमेंटवर. त्यात स्टाईल असते, वेग असतो, सफाईदारपणा असतो, गोंधळ असतो. थोडक्यात निओ-न्वारसाठी आवश्यक असलेला प्रत्येक घटक असतो. इतकंच काय तर चित्रपटाच्या शीर्षकात पण एक खुबी असते. ‘एक हसीना थी’ मधला ‘थी’ जेवढा महत्वाचा तेवढाच सूडाला वाहिलेल्या ‘बदलापूर’ मधला ‘बदला’. तेच चातुर्य आताच्या ‘अंधाधून’ या शीर्षकात. आता 'अंदाधुंद' या शब्दानंतर शक्यतो 'गोळीबार' (जो या चित्रपटातही आहे) याच शब्दाची सवय असलेया आपल्या कानांना आणि मेंदूला तोच शब्द एक अंध संगीतकार-गायक नायक असलेल्या चित्रपटाच्या शीर्षकात वापरताना तो फिरवून ‘अंधा-धून’ म्हणून ऐकवण्याचं कौशल्य तितकंच विलक्षण!

राघवनच्या चित्रपटाचा एक बऱ्यापैकी ठरलेला पॅटर्न असतो. प्रचंड वेगाने घडणाऱ्या धक्कादायक घडामोडींनी भरलेला पूर्वार्ध, समाजमान्य नसलेला रोमान्स किंवा विवाहबाह्य संबंध, जुन्या हिंदी चित्रपट/संगीत/कलाकार/गाणी/संवाद यांच्या संदर्भांची ठायी ठायी केलेली दृश्यात्मक पेरणी, प्रत्येक पात्राचं कुठल्या ना कुठल्या अपरिहार्य कारणाने का होईना पण चुकीच्या कृत्यात/गुन्ह्यात अडकणं आणि त्यामुळे त्याला (पात्राला) असणारी एक गडद किनार किंवा ग्रे शेड. ही भट्टी दर वेळी इतकी खमंग जमून येते की पट्टीच्या सुगरणीलाही कॉम्प्लेक्स यावा.

अंधाधून मधली भेळही अशीच नेहमीप्रमाणेच खुसखुशीतपणे जमून आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. सिनियर मोस्ट तब्बू पासून ते थेट दीडफुटी छोटू पर्यंत सगळ्यांनी केलेले भन्नाट अभिनय. तब्बूच्या तोडीस तोड वावरणारे आयुष्मान खुराणा आणि राधिका आपटे आहेत तसेच राघवनचे नेहमीचे यशस्वी अश्विनी कळसेकर आणि झाकीर हुसेनही.

अंध नायक आकाश (खुराणा) संगीत शिकवून आणि पियानो वाजवून उदरनिर्वाह चालवत असतो. परंतु प्रत्यक्षात तो अंध असल्याचा अभिनय करत असतो. आता यात स्पॉयलर अलर्ट देण्यासारखं काहीही नाही. कारण चित्रपट सुरु झाल्यावर जेमतेम अर्ध्या तासाच्या आतच हे तथाकथित रहस्य फुटतं. किंबहुना त्यात रहस्य असंही काहीच नाही कारण ट्रेलर मध्येही ते स्पष्टपणे दाखवलं आहेच. तर हा नायक त्याच्या दुर्दैवाने चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी पोचतो आणि अनवधानाने काही दुष्कृत्यांचा साक्षीदार बनतो. त्यातून सुटका करण्याच्या खटपटीत पहिलंच पाऊल इतकं चुकीचं पडतं की ते सावरताना गुंता वाढत वाढत जाऊन जीवावर बेतण्याची पाळी येते. अशा असंख्य वेगवान घटना आणि गुंत्यांच्या शिड्या चढत चढत चित्रपट मध्यंतरापर्यंत जबरदस्त लेवलला जाऊन पोचतो. तोच किंबहुना प्रसंगी थोडा अधिक वेगही मध्यंतरानंतर सुरुवातीला जाणवतो. नंतर पात्र, प्रसंग यांची सरमिसळ होऊन अनेक उपकथानकं जोडल्यासारखी वाटतात. या अनेक उपकथानकांच्या अनेकानेक उभ्या आडव्या धाग्यांमधला कुठला धागा महत्वाचा किंवा धरून ठेवण्यासारखा आहे या गोंधळात प्रेक्षक नक्कीच पडतो. पण दुर्दैवाने थोड्याफार अशाच द्वंद्वात खुद्द दिग्दर्शक देखील अडकल्यासारखा वाटतो. थोड्याफार फरकाने प्रत्येक चित्रपटात शेवटाच्या दिशेने प्रवास करताना राघवन याच द्वंद्वात अडकल्यासारखा वाटतो असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. अर्थात सुरुवातीपासून मिळणारा जबरदस्त अनुभव पाहता शेवटचा थोडासा गोंधळ दुर्लक्ष करता येण्याजोगा ठरतो हेही तितकंच खरं. या सगळ्या धावपळीत आणि गडबडगोंधळात कथानकाचा एक भाग म्हणून वेळोवेळी वाजणारी गाणी आणि पियानोचे सुश्राव्य पीसेस यांचा उल्लेख अनिवार्यच.

वरवर पाहता चित्रपट एका तथाकथित पॉझीटीव नोटवर संपतो. पण अगदी शेवटचा क्षण आणि नायकाची बॉडी लँग्वेज पाहता ओपनएन्डेड ठेवल्याचाही आभास निर्माण करतो. अर्थात कुठला शेवट स्वीकारायचा हे राघवन प्रेक्षकांवरच सोडतो. थोडक्यात जबरदस्त वेगाच्या आणि गुंत्याच्या धुंदीत अडकवून टाकणारा ‘अंधाधून’ आवर्जून आवर्जून पाहण्यासारखाच... पण डोळसपणे !!

ता क : जाता जाता आवर्जून नोंदवण्यासारखं निरीक्षण म्हणजे सुरुवातीला दाखवल्या जाणाऱ्या नामनिर्देशनांत (क्रेडिट्स) चित्रहार आणि छायागीतचा आवर्जून उल्लेख करणं हे श्रीराम राघवनचं ७०-८० च्या दशकातल्या हिंदी चित्रपट आणि हिंदी चित्रपटसंगीतावरचं प्रेम अधोरेखित करणारं !