Friday, May 12, 2023

फसवणूक, वेदना आणि शोषणाचा प्रलयकारी आगडोंब : द केरला स्टोरी




काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवड्यांतच 'केरला स्टोरी' चं टिझर पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आलं होतं आणि त्यावेळी फक्त ते दीडेक मिनिटांचं टिझर पाहूनच अक्षरशः थरकाप उडाला होता. 'लव जिहाद' या भयंकर स्फोटक आणि अस्पर्श विषयावर चित्रपट काढण्याचा कोणी विचारही करू शकेल असं वाटू न शकण्याचा तो काळ होता. काश्मीर फाईल्स भल्याभल्यांच्या विरोधाला न जुमानता पाय रोवून घट्ट उभा होता आणि त्यामुळेच कदाचित खरंच केरला स्टोरी वर चित्रपट बनेलं, प्रदर्शित होईल आणि सर्वसामान्य प्रेक्षकांना तो बघताही येईल याची अंधुकशी आशा निर्माण झाली होती. अँड यस.. जेमतेम वर्षभरात केरला स्टोरी चित्रपटगृहात झळकला आणि भल्याभल्यांचे अंदाज चुकवत अमाप यशस्वीही झाला. अक्षरशः एकही स्टार कलावंत नसलेला, मेकिंग आणि प्रसिद्धी साठी करोडो रूपयांचं बजेट नसलेला, पूर्वप्रसिद्धी साठी कुठल्याही फुटकळ हास्यास्पद कार्यक्रमांमध्ये हजेरी न लावणारा, जेमतेम १५-२० कोटींत बनलेला चित्रपट निव्वळ आणि निव्वळ कन्टेन्टच्या दर्जाच्या बळावर उभा तर राहतोच पण हजारो लोकांना चित्रपटगृहात खेचून आणून फक्त दोन आठवड्यांच्या कालावधीतच शंभर कोटींच्या कमाईच्या दिशेने मार्गक्रमणा करतो हा खरोखरच सुखद असा धक्का आहे.  

एवढं कौतुक करण्यासारखं विशेष असं त्या चित्रपटात आहे तरी काय? आणि प्रेक्षकांच्या एवढ्या कौतुकाला आणि प्रेमाला तो खरंच पात्र आहे का? आणि असला तर का? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधणं आवश्यक आहे. 'केरला स्टोरी' आणि 'काश्मीर फाईल्स' या दोन्ही प्रचंड यशस्वी ठरलेल्या चित्रपटांमध्ये काही साम्यस्थळं नक्की आहेत. पहिली गोष्ट म्हणजे केरला स्टोरी हा ही काश्मीर फाईल्स प्रमाणे तीन कालरेषां (टाईमलाईन्स) वर घडतो आणि अरेखीय (नॉन-लिनिअर) पद्धतीने आपल्यापुढे सादर केला जातो. सद्यकाळ, काही महिन्यांपूर्वीचा काळ आणि दोन वर्षांपूर्वीचा काळ अशा तीन काळांत घडणाऱ्या या चित्रपटात पडद्यावर दाखवला जाणारा काळ कुठला आहे हे फक्त सुरुवातीला एकदा सांगितल्यावर त्यानंतर पुढे एकदाही सांगायची गरज पडत नाही इतक्या हुशारीने आणि खुबीने आपल्यासमोर सुस्पष्ट (self explanatory) प्रसंगांची मालिका दाखवण्यात दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि संकलक संजय शर्मा हे कमालीचे यशस्वी झाले आहेत.

दिग्दर्शक सुदिप्तो सेनने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे 'लव जिहाद' ही संज्ञा केरळमधील एका चर्चच्या आर्चबिशप यांनी १९९८ साली सर्वप्रथम वापरली. अन्य धर्मांतील लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्मपरावर्तित करण्याचं ख्रिस्ती धर्माचं महत्त्वाचं कार्य करत असताना त्यांच्या अचानक लक्षात आलं की ख्रिस्ती धर्मातील युवती या छळाबळाने किंवा धाकदपटशा वापरून मोठ्या प्रमाणात धर्मांतरित केल्या जात आहेत. आणि त्यानंतर या प्रकारच्या घटनांना दबकत दबकत का होईना वाचा फुटली. या घटना कशा घडतात, सुशिक्षित आणि सुसंस्कारित घरातल्या मुली इतक्या सहजपणे धर्मपरिवर्तनाला कशा तयार होतात, धर्मपरिवर्तनाची नक्की प्रक्रिया काय, त्यातले टप्पे कुठले, कुठल्या टप्प्यांवर नक्की काय काय घडतं, धर्मपरिवर्तना झाल्यानंतर त्या मुलींचा प्रवास नक्की कुठल्या दिशेने होतो, त्यांच्या कुटुंबियांचं पुढे काय होतं, या सगळ्याच्या मागे कुप्रसिद्ध जागतिक दहशतवादी संघटना आयसिस ही कशी आहे, आयसिसचा पसारा नक्की कुठल्या देशांत आणि कुठवर पसरला आहे आणि आयसिस संघटना एवढे सगळे देश, धर्म आणि मानवतेच्या विरुद्ध असलेले क्रूर प्रकार इतक्या सहजी कशी घडवून आणते आहे अशा असंख्य प्रश्नांची वस्तुनिष्ठ आणि डोळसपणे दिलेली उत्तरं म्हणजे केरला स्टोरी हा चित्रपट.

संपूर्ण जगावर फक्त शरिया/शरियत चाच कायदा लागू झाला पाहिजे असं आयसिस चं स्पष्ट मत असून इराक आणि सीरियाच्या ज्या काही ठराविक प्रदेशांवर त्यांचं राज्य होतं त्या भूमीवर (म्हणजेच दार-उल-इस्लाम अर्थात इस्लामच्या भूमीवर) आयसिसने शरियतचा कायदा अंमलात आणला. या कायद्यानुसार छोट्या छोट्या गुन्ह्यांना भयंकर शिक्षा आहेत आणि या सर्व प्रकारांवर हा चित्रपट सचित्र भाष्य करतो. स्त्रीने मेकअप केल्याबद्दल हात तोडणे आणि पुरुषाने आपल्या पत्नीला तो करू दिल्याबद्दल त्याच्या डोक्यात गोळी घालणे, स्त्रियांना मोबाईल वापरास संमती नसणे आणि तो वापरल्यास देहांताची शिक्षा मिळणे, युद्धात बंदी बनवलेल्या स्त्रियांना लैंगिक गुलाम (सेक्स स्लेव्ह) म्हणून वापरणे, त्यांना उपाशी ठेवणे, कोंडून ठेवणे, मारपीट करणे, बंदिवान स्त्रियांचा बाजारातल्या एखाद्या वस्तूप्रमाणे लिलाव करणे, विवाहबाह्य संबंध असलेल्या स्त्रीपुरुषाला दगडांनी ठेचून मारणे या आणि अशा प्रकारच्या अनेक शिक्षांचं भयंकर दर्शन चित्रपटात घडतं. व्यभिचारी स्त्रीला कंबरेपर्यंत जमिनीत गाडून ठेवून त्यानंतर ती मरेपर्यंत तिच्यावर (अर्थात फक्त पुरुषांनीच) यथेच्छ अशी दगडफेक करण्याच्या कैक घटना आयसिसचा अंमल असलेल्या प्रदेशात घडलेल्या आहेत. अशा एका सोराया मानुचेरी नावाच्या इराणी स्त्रीच्या बाबतीत घडलेल्या सत्यघटनेवर आधारित असलेल्या 'द स्टोनिंग ऑफ सोराया एम' नावाच्या पुस्तकावर आधारित त्याच नावाचा एक चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. त्या पुस्तक आणि चित्रपटातल्या 'स्टोनिंग' च्या प्रसंगाशी तंतोतंत जुळणारा एक प्रसंग चित्रपटाच्या सुरुवातीलाच नायिकेला अपघातानेच दिसतो आणि तिच्याबरोबर प्रेक्षकही हादरून जातात.



केरळातील कासरगोड या हिंदुबहुल जिल्ह्यातील एका नर्सिंग कॉलेजच्या भिंतींवर काश्मीरच्या मुक्ततेची मागणी करणाऱ्या घोषणा बघून नायिका तर थबकतेच पण प्रेक्षकांनाही काश्मीर फाईल्सची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मुलींच्या वसतिगृहातल्या खोलीत निरनिराळ्या धर्मांच्या विद्यार्थिनींमध्ये एका ट्रोजन हॉर्स अर्थात चांगुलपणाचा मुखवटा धारण केलेल्या परंतु मूळची आयसिसची छुपी हस्तक असलेल्या मुलीचा प्रवेश होतो आणि पहिल्या दिवसापासूनच चित्र पालटायला सुरुवात होते.

स्वपंथाचा/धर्माचा अतिरेकी प्रचार, अन्य धर्म, धर्मश्रद्धा, त्यांचे देव यांचा सतत पाणउतारा करून त्यांना हिणवणे हे प्रकार ठरवून केले जातात आणि बघताबघता वाढत जातात. सुरुवातीला विरोध करणाऱ्या नायिकेचा आणि तिच्या मैत्रिणीचा हळूहळू नाईलाजाने का होईना या गोष्टींवर विश्वास बसत जातो. त्याच वेळी त्या मुलींना प्रेमात पडायला भाग पाडून, भुलवून, लैंगिक संबंध प्रस्थापित करून, त्यांच्या स्वधर्माच्या श्रद्धांचा त्याग करण्यास भाग पाडून अखेरीस त्यांचं धर्मांतर करण्याची संपूर्ण प्रक्रिया एखाद्या SOP अर्थात स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणे अवलंबिली जाते. (एकाच) धर्मा/पंथावर श्रद्धा असणाऱ्यांनी अर्थात श्रद्धावानांनी श्रद्धाहीनांवर एक तर दगड मारावेत किंवा त्यांच्यावर थुंकावं पण त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणं निषिद्ध आहे मात्र त्याच वेळी श्रद्धाहीनांची संपत्ती लुबाडण्याचा मात्र त्यांना संपूर्ण अधिकार आहे अशा प्रकारची अतिरेकी, एकांगी आणि तितकीच अमानुष आणि क्रूर अशी शिकवण देणाऱ्या पंथाचं भयानक चित्रण चित्रपटात दाखवलं आहे.  स्वतःचा धर्म, आपले धर्मसंस्कार, धर्मशिक्षण यांचा मुलांमुलींच्या बालपणीपासूनच्या जडणघडणीतच कसा अभाव आहे हे दिग्दर्शकाने अतिशय प्रत्ययकारीपणे दाखवलं आहे. अशा प्रकारे धर्म न मानणाऱ्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांच्या आणि पक्षांच्या हातात वर्षानुवर्षं केरळची सत्ता असल्याने देव, धर्म, श्रद्धा या अत्यंत मूलभूत संकल्पनांनाच चूड लावली गेलेली बघताना सावरकरांच्या "धर्मांतर हेच देशांतर" या उक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

या प्रवासात शारीरिक संबंध प्रस्थापित करणे ही सर्वात महत्त्वाची पायरी असून ती करताना मुलगा आणि मुलगी यांची मान्यता (कुबुलनामा) असल्यावर इतरांच्या संमतीची आवश्यकताच काय (अर्थात मियाँ बीवी राजी...) किंवा प्रेम केलंय तर प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी हवी, सर्वधर्मसमभाव महत्त्वाचा, प्रेम हे धर्म बघून करता येत नाही, सर्व धर्म सारखेच असून सर्वच धर्म शांतीचा संदेश देतात वगैरे वगैरे हिंदी चित्रपटसृष्टीने प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षं गारुड केलेल्या चुकीच्या प्रचारकी संदेशांचा यथेच्छ वापर करून, पद्धतशीरपणे ब्रेनवॉशिंगची एकेक पायरी साध्य करत, धर्मांतराच्या दिशेने एकेक पाऊल यशस्वीपणे कसं पुढे पुढे टाकलं जातं याचं चीड आणणारं पण सत्यचित्रण बघताना आजवर बघितलेले सर्वधर्मसमभाववाले हजारो फसवे चित्रपट आणि त्यांतले तितकेच फसवे प्रसंग आणि संवाद प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्याशिवाय राहत नाहीत.

हे महत्त्वाचे टप्पे यशस्वीपणे पार पाडल्यानंतर अखेरच्या आणि सर्वात महत्त्वाचा असलेल्या टप्प्याच्या दिशेने नायिकेची वाटचाल सुरु होते आणि तो टप्पा म्हणजे आयसिसच्या अधिपत्याखाली असणाऱ्या देशांत नायिका आणि अशाच प्रकारे फसलेल्या अन्य असहाय्य आणि हतबल तरुणींना घेऊन जाऊन तिथे आयसिसच्या सैन्यात असलेल्या पुरुषांची शारीरिक भूक भागवण्याच्या कामासाठी त्यांचा यंत्रवत वापर करून घेऊन त्यानंतर त्यांचा मानवी बॉम्ब म्हणून वापर करून त्यांचं जीवन संपवणं. 

इराकमधील नादिया मुराद या याझिदी जमातीच्या स्त्रीने हे दुर्दैवी आयुष्य स्वतः भोगलं असून आपले भयानक अनुभव आणि आयसिसची मानसिकता आणि क्रौर्य याविषयी तिने 'द लास्ट गर्ल' हे पुस्तक लिहिलं आहे. आयसिसबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे. अमेरिकन स्त्रीला फसवून इराणमध्ये नेऊन धर्मांतराचे प्रयत्न, तिचे शारीरिक, मानसिक हाल आणि तिचं तिथून झालेलं सुदैवी पलायन या विषयी बेटी महमूदी यांचं 'नॉट विदाऊट माय डॉटर' हे पुस्तक तर अनेकजणांनी वाचलेलं असतंच.

इतक्या भयंकर अशा प्रसंगांची मालिका असणारे प्रसंग दाखवताना वाहवत जाणं, प्रत्येक प्रसंग अत्यंत भडक व बटबटीत करून दाखवणं ही अगदीच सहज घडू शकणारी गोष्ट दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी अतिशय संयमपूर्वक टाळली आहे ज्याबद्दल त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अनेक भडक प्रसंग त्यांनी अत्यंत संतुलित आणि संयमित पद्धतीने दाखवले आहेत. सामूहिक बलात्कारांच्या घटनांचं चित्रीकरण छायाप्रकाशाच्या साहाय्याने करणं, लेनिन-स्टालिन-मार्क्सच्या पोस्टर्समधून योग्य तो संदेश पोचवणं, औरंगजेब आणि आयसिस या विचारांतील साम्य दर्शवणं, दिवसाढवळ्या माणुसकीची सरळसरळ हत्या होत असलेल्या पाकिस्तानच्या सीमाप्रदेशात 'बलोच ह्युमन राइट्स' चे फलक दाखवणं, सततच्या ब्रेन वॉशिंगने पूर्णतः बदललेल्या नायिका एका वठलेल्या झाडाच्या पार्श्वभूमीवर दाखवणं, लव जिहादच्या घटनांनावर संशोधन आणि अभ्यास करून त्याचे पुरावे आणि संदर्भ मांडणाऱ्या सहनायिकेच्या मागे 'मुख्तार माई' चं पोस्टर दाखवून मुख्तार माई ही हा एकाकी लढा देणाऱ्या सहनायिकेच्या जणू पाठीशीच उभी आहे असं दाखवणं या सगळ्यासगळ्यांतून दिग्दर्शकाचा दिग्दर्शन, छायाचित्रण याबरोबरच सामाजिक आणि राजकीय संदर्भांचा अभ्यास स्पष्टपणे दिसतो.




मुख्तार बीवी किंवा मुख्तार माई ही नक्की कोण होती हे वाचलं की दिग्दर्शकाच्या या एकूणच समस्येच्या अभ्यासाबद्दल कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. २००२ साली मुख्तार माई या पाकिस्तानी स्त्रीला तिच्या भावाने केलेल्या गैरकृत्याबद्दल क्षमा मागण्याच्या बहाण्याने तिच्या टोळीच्या न्यायालयासमोर बोलावण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला, तिची नग्न धिंड काढण्यात आली. मात्र घाबरून किंवा खचून न जाता मुख्तार माईने आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि झगडून न्याय मिळवला. या घटनेला जगभर प्रसिद्धी मिळाली. 'इन द नेम ऑफ ऑनर' या पुस्तकात मुख्तार माईच्या या लढ्याविषयीची कहाणी वाचायला मिळते.

सहनायिकेच्या अभ्यासातून सामोरी येणारी सत्यं तर अतिशय भयंकर आहेत. केरळचं रूपांतर कधीही स्फोट होऊ शकेल अशा एका टाईमबॉम्ब मध्ये झालेलं आहे, कासारगोड जिल्ह्याच्या काही गावांत ऑलरेडी शरिया कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे, केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका विधानानुसार येत्या वीस वर्षांत केरळचं रूपांतर एका इस्लामी राज्यात होण्याची चिन्हं आहेत!!! आपल्याच देशातल्या एका छोट्या पण तितक्याच निसर्गरम्य आणि सुंदर राज्याविषयीची ही वस्तुस्थिती वाचताना अतिशय त्रास तर होतोच पण ही एवढी सगळी देशद्रोही कृत्यं घडत असताना जनतेने ज्यांना विश्वासाने निवडून दिलं ती नेतेमंडळी नक्की काय करत होती हा प्रश्नही मनात आल्यावाचून राहत नाही!

काश्मीर फाईल्सशी साधर्म्य सांगणारी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्श्वभूमीवर वाजत राहणारी अत्यंत सुंदर गाणी. कधी त्यातून 'ना जमी मिली' सारखा वेदनेचा राग आळवला जातो तर कधी केरळच्या देवभूमीचं मल्ल्याळी भाषेत वर्णनं केलं जातं. ना जमी मिली, तू मिला ही गाणी खरोखरच अत्यंत श्रवणीय झाली आहेत.  

आपला देश काश्मीर पासून ते केरळपर्यंत एक आहे असं नेहमी जेव्हा म्हंटलं जातं तेव्हा त्यामागे भारताच्या भौगोलिक सीमांपेक्षाही या दोन प्रदेशांना वेढून टाकणारी आणि त्यांनी भोगलेली आणि अजूनही भोगत असलेली एक सामायिक वेदना अध्याहृत असावी असं वाटतं. हे दोन्ही प्रदेश सतत त्यांच्या या वेदना, त्यांच्या यातना, त्यांची हतबलता हे सारं अगदी उच्चरवाने ओरडत, कण्हत, भेकत मांडतायत. पण या दोन भुगोलांच्या मध्ये असलेला सारा देश दुर्दैवाने या साऱ्या अन्याय्य प्रकाराकडे ढिम्मपणे दुर्लक्ष करतोय. या वेदनेच्या साखळदंडांत आपल्याच देशाचे अजून प्रदेश आणि अर्थातच तिथले निष्पाप जीव कैद होऊ नयेत यासाठी आपण काही कृती करणार आहोत की अजून काही स्टोरी, काही फाईल्स उघडण्याची वाट बघत बसणार आहोत याचा निर्णय सर्वस्वी आपल्यालाच घ्यायचा आहे!!

--हेरंब ओक

Monday, March 27, 2023

कार्निव्हल ऑफ गनफाईट अर्थात बंदूकयुद्धांचं महासंमेलन : जॉन विक


'जॉन विक चॅप्टर ४' सुरु होतो तो वाळवंटातल्या एका घोडेस्वारांच्या पाठलागाच्या प्रसंगाने ज्याची मुळं तिसऱ्या भागात आहेत. त्यानंतर आपण जपान मधल्या ओसाका इथल्या ओसाका कॉन्टिनेन्टल या हॉटेल मध्ये येऊन पोचतो. न्यू यॉर्क शहरातलं कॉन्टिनेन्टल हॉटेल, तिथलं गूढ काळोखी वातावरण, उंच खिडक्या आणि झरोके, त्यातून पडणारे सूर्यकिरणांचे कवडसे या सगळ्याचे संदर्भ आणि अर्थ पहिल्या तीन भागांत पुरेशा तपशिलाने येऊन गेलेले आहेत. चौथा धडा एका अर्थाने स्वतंत्र असला तरी पहिल्या तीन भागांचे वेळोवेळी येणारे संदर्भ पाहता तो पहिल्या तीन भागांचा काहीसा विस्तारित भाग (extension) आहे असंही म्हणता येईल. थोडक्यात पहिले तीन भाग न बघता थेट चौथा धडा बघायला गेल्यास पदरी निराशा पडू शकते. 

जॉन विक हा गुन्हेगारी विश्वातला एके काळी आख्यायिका (legend) बनून गेलेला, जगभरातल्या माफिया विश्वात भययुक्त आदराने नाव घेतला जाणारा पण आता बायकोच्या निधनानंतर निवृत्त झालेला एक लढवय्या आहे. अर्थात पहिल्या भागातलय सुरुवातीच्या क्षुल्लक बोलाचाली आणि त्यानंतर घडणाऱ्या गंभीर परिणामांमुळे चवताळून जाऊन सूडाच्या अग्नीने पेटून उठलेला जॉन विक बघताना त्याची ही पूर्वाश्रमीची थोरवी प्रेक्षकांना माहितच नसते. एकेक प्रसंग जसजसे घडत जातात आणि कथा पुढे पुढे सरकत जाते तसतसं जॉन विक हा काय प्रकार आहे हे आपल्या लक्षात यायला लागतं. पहिला भाग तुलनेने खऱ्या विश्वाशी संलग्न (कनेक्टेड) आहे. दुसरा आणि त्यानंतरचे सगळे भाग काही तुरळक अपवाद वगळता या आपल्या खऱ्या विश्वाबाहेर एखाद्या समांतर विश्वात किंवा 'जॉन विक युनिव्हर्स' मध्ये घडतात असं वाटावं एवढे अविश्वसनीय आहेत. 

तसं पाहायला गेल्यास जॉन विकचं व्यक्तिमत्व अतिशय सामान्य आहे. तो जॅक रीचर किंवा रॅम्बोप्रमाणे अंगापिंडाने मजबूत नाही, ब्रूस ली किंवा जॅकी चॅन प्रमाणे मार्शल आर्टस् किंवा तत्सम युद्धप्रकारात त्याने प्राविण्य मिळवलं आहे असंही नाही किंवा जॉन मॅक्लेन (Die Hard) किंवा डर्टी हॅरीप्रमाणे तो चमकदार आणि उठावदार संवादांच्या फैरीही झाडत नाही. तो फारच कमी बोलतो किंवा प्रसंगी बोलतही नाही. ज्याप्रमाणे सचिनवर झालेल्या शाब्दिक हल्ल्यांना तो त्याच्या बॅटने प्रत्युत्तर देत असे तद्वतच जॉन विक आपल्यावरील हल्ल्यांना न बोलता सामोरा जातो. फरक इतकाच की इथे शाब्दिक हल्ले नसून प्रत्यक्षातले जीवघेणे हल्ले असतात. आता इतकी नकारघंटा वाजवल्यावर जॉन विकमध्ये एवढं विशेष काय आहे की ज्याच्या चित्रपटाचे ४ भाग निघावेत आणि त्याच्याबद्दल एवढं लिहिलं जावं असा प्रश्न कोणालाही पडू शकेल. 

जॉन विकचे तीन महत्वाचे गुण म्हणजे तो प्रामुख्याने बंदुकांनी केल्या जाणाऱ्या युद्धाचा सम्राट आहे. गनफाईट्स मधलं प्राविण्य हे त्याच्या पात्राचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बंदूक नसेल तर अन्य कुठल्याही वस्तूचा वापर तितक्याच शिताफीने हत्यार किंवा आयुध म्हणून वापरण्याचं त्याचं वादातीत असं कौशल्य. तिसऱ्या भागातल्या वाचनालयात घडणाऱ्या एका हाणामारीच्या प्रसंगात तो एका जाडजूड पुस्तकाचा वापर हत्यार म्हणून करतो हे आपल्याला आठवत असेलच. आणि तिसरा गुण म्हणजे जगण्याची किंवा टिकून राहण्याची (survival) तीव्र इच्छाशक्ती आणि जोडीला मिळणारी नशीबाची तितकीच महत्वाची असलेली साथ! अर्थात कुठलीही वस्तू शस्त्र म्हणून वापरण्याची जॉन विकची तयारी असली तरी बंदुकांएवढा कम्फर्टेबल तो कुठल्याही शस्त्रासोबत नाही हे ही तितकंच खरं. चॅप्टर ४ मध्ये नानच्याकु वापरतानाच्या त्याच्या कमालीच्या संथ हालचाली बघून ते जाणवतंच. 

पहिल्या भागाचा काहीसा अपवाद वगळता यातल्या एकही भागाला कथा अशी नाहीच. जॉन विक स्वतः फार कमी बोलतो आणि इतर वेळ हात, पाय आणि बंदुका चालवत असतो. एका हाणामारीच्या प्रसंगानंतर दुसरा, मग तिसरा, त्यानंतर चौथा आणि अशा अनेक प्रसंगांची रांग अशा स्वरूपात चित्रपट पुढे सरकतो. पण या हाणामाऱ्या अत्यंत शैलीदार आहेत, अतिशय स्टायलिश आहेत. स्वतः जॉन विक कायम थ्री पीस सूट, टाय आणि बूट अशाच रूपात किमान ९५% वेळा वावरतो. मारामारीचे प्रसंग प्रयत्नपूर्वक आणि काळजीपूर्वक अतिशय देखणे वाटतील अशा पद्धतीने चित्रित केले आहेत. पार्श्वसंगीताच्या तालावर थिरकणाऱ्या शैलीदार नृत्याच्या हालचाली वाटाव्यात असे नितांतसुंदर आणि नयनरम्य असे हाणामारीचे प्रसंग यात आहेत. कित्येकदा या मारामाऱ्यांचा दर्जा  एखाद्या कॉम्प्युटर गेममधल्या चढत्या पातळीप्रमाणे अधिकाधिक शैलीदार तर आहेच तर अनेकदा त्या तितक्याच गुंतागुंतीच्याही आहेत. 

इतक्या शैलीदार आणि प्रमाणबद्ध मारामाऱ्या बघून 'किल बिल' मधल्या मारामाऱ्या किंवा 'किंग्जमन : द सिक्रेट सर्व्हिस' मधल्या चर्चमधल्या स्टायलिश आणि वेल-कोरिओग्राफ्ड हाणामाऱ्यांची आठवण येते. हे हाणामारी आणि पाठलागांचे प्रसंग आधीच्या भागांतही अतिशय लांबलचक आहेतच पण चॅप्टर ४ मध्ये त्यांची लांबी अधिकच आणि विशेष प्रयत्नपूर्वक वाढवल्यासारखी वाटते. चित्रपटाच्या शेवटाकडे असलेलं, पॅरिसमधल्या Arc de Triomphe च्या रस्त्यावर घडणारं, गाड्या आणि बाइक्स यांच्या सोबतीने घडणारं बंदूकयुद्ध असो किंवा अखेरीस घडणारी लांबलचक जिन्यावरची तितकीच लांबलचक गनफाईट असो, या सगळ्यात एक अतीव देखणेपणा आहे हे सतत जाणवत राहतं. 

अर्थात हे मारामाऱ्यांच्या प्रसंगांना अत्यंत देखण्या पद्धतीने करण्यात आलेलं छायाचित्रण आणि वेगवेगळ्या प्रकारे वापरण्यात आलेले कॅमेरा अँगल्स यांचंही तेवढांच महत्व आहे. चॅप्टर ४ मध्ये शेवटी एका मोठ्या घरात घडणारा शॉटगनच्या हाणामारीचा प्रसंग छपराच्या अँगलने टिपण्याचा कौशल्याला जितकी दाद देऊ तितकी कमी आहे. तो प्रसंग अशा पद्धतीने चित्रित केल्यामुळे संपूर्ण घराचा अर्थात बॅटलफिल्डचा टॉप व्ह्यू प्रेक्षकांना सतत दिसत राहतो. 

अर्थात याच नव्हे तर सगळ्याच भागांत अनेक अविश्वसनीय किंवा प्रसंगी निर्बुद्ध वाटावे असे प्रसंगही आहेतच. पण ते 'विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफ' च्या अंतर्गत सोडून द्यायचे असतात हे ही प्रेक्षकांना एव्हाना ठाऊक झालेलं असतंच. 

काही चित्रपटांचे संवाद दर्जेदार असतात तर काहींची कथा-पटकथा, काहींचं संगीत जादुई असतं तर काहींचं कॅमेरावर्क. यातलं काहीही बघायला मिळणार नाही हे मान्य असेल पण या सगळ्यांना पुरून उरेल इतक्या देखण्या, सुबक, नयनरम्य, दर्जेदार, नृत्यसदृश, नेत्रसुखद हाणामाऱ्यांचे लांबलचक प्रसंग बघायची तयारी असेल त्यांनी 'जॉन विक चॅप्टर ४' आवर्जून बघा. अर्थात तत्पूर्वी आधीचे तीन भाग पाहायला मात्र विसरू नका !

तळटीप : चित्रपट अजिबात विनोदी नसला तरी सेन्सॉर बोर्डाच्या कृपेने चित्रपटात अनवधानाने एकच विनोद अनेकदा घडला आहे. अनेकदा पडद्यावर बंदुका, तलवारी, चाकू, ऑटोमॅटिक रायफल्स अशी अनेक हत्यारांची रेलचेल असण्याचे प्रसंग आहेत आणि त्याचवेळी पडद्यावरील एखादं पात्र धूम्रपान किंवा मद्यपान करताना दाखवलं आहे. आणि अशा वेळी "स्मोकिंग किल्स" अशी पाटी झळकताना बघून त्या बंदुका आणि तलवारींची कीव आल्यावाचून राहत नाही!

-हेरंब ओक

Tuesday, August 16, 2022

Gained* in Translation

सहसा चित्रपट हा तो ज्या पुस्तक/कादंबरीवर आधारित आहे त्याच्या मानाने डावा (वैचारिक नव्हे गुणात्मक रित्या) असतो हा एक सर्वमान्य प्रघात आहे. आणि तो सिद्ध करण्यासाठी खंडीने देता येतील इतके पुरावेही उपलब्ध आहेत. या विषयावर अनेकदा लेखन झालेलं आहे किंवा पुस्तकावर आधारित कुठलाही (काही सन्माननीय अपवाद वगळता) चित्रपट आपण पुराव्यादाखल घेऊ शकतो.

या प्रवादाला छेद देणारा किंवा नियम सिद्ध करणारे असे काही अपवाद नुकतेच नजरेस आल्याने हा लेखप्रपंच. अर्थात हे चित्रपट खूप जुने आहेत आणि ते ज्या पुस्तकांवर आधारित आहेत ते तरअर्थातचत्याहूनही जुने आहेत. ते चित्रपट मी फार पूर्वीच बघितले होते. मात्र पुस्तकं वाचण्याचा योग अलीकडेच आल्यानेजगन्मान्य प्रवादाला छेद देणारं उदाहरण वाटलं म्हणून इथे मांडतोय इतकंच. अर्थात अनेकांना हा अपवाद न वाटता नियमच वाटेलअर्थात पुस्तकच चित्रपटापेक्षा अधिक दर्जेदार आहे असं वाटू शकतंच आणि तेही अमान्य असण्याचं काहीच कारण नाही.

सध्या चुकीच्या कारणांसाठी प्रसिद्ध झालेला 'फोरेस्ट गम्प१९९४ साली प्रदर्शित झाला आणि Shawshank Redemption (याच्या बद्दलही नंतर बोलूच) सारख्या भल्याभल्या तगड्या चित्रपटांना आस्मान दाखवून त्याने ढिगाने ऑस्करच्या बाहुल्याही जमा केल्या. किमान चड्ढा मुळे का होईना पण गम्प बघितलेल्यांची संख्या अमाप आहे त्यामुळे त्याबद्दल विशेष काही लिहायची आवश्यकता नाहीच. पण तरीही अत्यंत कमी बुद्ध्यांक असलेल्याअमेरिकेच्या गेल्या ५०-६० वर्षांच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांचा साक्षीदार असणारा (प्रसंगी त्या घडायला कारणीभूत ठरणारा. उदा. वॉटरगेट प्रकरण) अत्यंत सुदैवी आणि वैयक्तिक आयुष्यात तितकाच दुर्दैवी असणाऱ्या एका सर्वसामान्य अमेरिकन तरुणाची कथा असं याचं वर्णन करता येईल. हा चित्रपट Winston Groom या अमेरिकन लेखकाच्या Forrest Gump याच नावाच्या १९८६ साली प्रकाशित झालेल्या आणि अल्पावधीतच वाचकांनी प्रचंड डोक्यावर घेतलेल्या पुस्तकावर आधारित होता. Winston Groom चं हे पुस्तक नुकतंच वाचलं. गम्पचा निरागसपणाबावळटपणासुदैवी असणं हे चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच आहे. सुरुवातीचे काही प्रसंगफोरेस्ट आणि त्याची मैत्रीण जेनीचे संबंध हे सगळे पूर्वार्धात आहेत. त्यानंतर फोरेस्टची चीनची सफर आणि त्यात चीनचा सर्वेसर्वा माओ यांगत्से नदीत पोहत असताना बुडायला लागतो आणि फोरेस्ट जीवावर उदार होऊन त्याला वाचवतोत्यामुळे चीनी जनता त्याच्यावर प्रचंड प्रक्षुब्ध होते असा एक अतिशय खुसखुशीत प्रसंग त्यात आहे. चित्रपटाने आपला परीघ अमेरिकन राजकारण आणि समाजजीवन एवढ्यापुरताच मर्यादित ठेवलेला असल्याने कदाचित चित्रपटात हा प्रसंग नसावा. परंतु त्याची भरपाई म्हणून अमेरिकन राजकारणातले अनेक प्रसंग मजेशीररित्या मांडण्यात आले आहेत हे ही खरंच. पण त्यानंतर पुस्तकात आश्चर्यकारकरित्या फोरेस्टची निवड अंतराळवीर म्हणून होतेतो सू नावाच्या एका चिम्पाझीबरोबर अंतराळात जातोतिथे अनेक विचित्र प्रसंग घडतातप्रत्यक्षात चुकीची चिम्पाझी नेली जाते असे बरेच विचित्र प्रकार घडतात. आणि कदाचित हा सगळा प्रकार कुठे संपवावा हे लक्षात न आल्याने shrimp business भरभराटीला आल्याचं दाखवून पुस्तक विराम घेतं. वर म्हंटल्याप्रमाणे अमेरिकन इतिहास आणि समाजजीवन हा परीघ डोळ्यासमोर ठेवल्याने चित्रपट अधिक बांधीवरेखीव वाटतो मात्र पुस्तकाच्या बाबतीत हे घडत नाही. अर्थात हे पुस्तकही त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झालं होतं हेही तितकंच खरं.

दुसरं उदाहरण म्हणजे David Morrell च्या १९७२ साली प्रकाशित झालेल्या 'First Blood' या कादंबरीवर आधारित असलेला सिल्व्हेस्टर स्टॅलनचा १९८२ साली प्रदर्शित झालेला सुप्रसिद्ध आणि अमाप लोकप्रियता मिळवलेला त्याच नावाचा चित्रपट. "They drew the First Blood"  हा स्टॅलनचा तुफान गाजलेला संवाद माहित नसेल असा चित्ररसिक विरळाच. व्हिएतनाम युद्धातून परतून आलेल्यादेशाच्या नेतृत्वाने आपल्याला फसवलं अशी भावना असलेल्या अत्यंत निराश आणि आतल्या आत धुमसणाऱ्या एका निवृत्त सैनिकाची एका छोट्या शहराच्या पोलीस प्रमुखाशी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची होते आणि त्या ego clash मुळे पुढे घडणारा भयंकर संहार आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतो. चित्रपट अतिशय प्रवाही आहेवेगवान आहे. उत्कृष्ट संवाद आणि छायाचित्रण यांची जोरदार साथ दिग्दर्शक Ted Kotcheff ला लाभली आहे. रॅम्बो आणि पोलीसप्रमुख यांची पहिली भेटत्याची अटकपलायन हा सर्व भाग पुस्तकात अतिशय वेगाने घडतो आणि त्यामुळेच पुढे काय घडणार आहे हे माहित असूनही अतिशय उत्कंठाही निर्माण करतो. परंतु रॅम्बो जंगलात पळून गेल्यानंतरची वर्णनंपोलिसप्रमुखाचे संवादत्याची पार्श्वभूमीत्यांचं एकमेकांसमोर येणं हे एवढं संथ गतीने घडतं की चित्रपटातला वेग पुस्तकात कुठेच दिसत नाही. दरम्यानची वर्णनंघटनाही बऱ्यापैकी क्लिष्ट भाषेत (कदाचित त्याकाळच्या साहित्यिक मूल्यांना आणि नियमांना अनुसरून) असल्याने पुस्तक बऱ्यापैकी निराश करतं. निदान माझी तरी निराशा झाली. Morrell चं हे पुस्तक प्रचंड गाजलंअनेक विद्यापीठांमध्ये ते अभ्यासक्रमात लावण्यात आलं होतं हे पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या Morrell च्या मनोगतातून कळतं. पण तरीही पुस्तक काही मनाचा ठाव घेत नाही हे नक्की.


हे सगळं आठवण्याचं मुख्य कारण म्हणजे नुकताच बघितलेला The Black Phone हा चित्रपट. उत्तर डेनवर मधल्या एकदा छोट्या शहरातून १०-१२ या वयोगटातली मुलं गायब व्हायला लागतात. दरम्यान चित्रपटाचा नायक फिनी याच्यावरही दुर्दैवाने तीच वेळ येते. त्याला एका घराच्या तळघरात कोंडून ठेवलं जातं. तळघरात असलेल्या जुनाट फोनच्या (black phone च्या) मदतीने फिनी कशी सुटकेची धडपड करतो हे चित्रपटात पाहायला मिळतं. चित्रपट अतिशय गडद आहे. म्हणजे शाब्दिक आणि लाक्षणिक अशा दोन्ही प्रकारांनी. कारण निम्म्याहून अधिक चित्रपट अंधारात घडतो हे एक कारण झालंच. परंतु चित्रपटात वेळोवेळी भेटीस येणारे गडदकाळी छटा असणारे प्रसंगही चित्रपटाच्या भयप्रद वातावरणाला अजूनच काळोखी किनार बहाल करतात. कथानायकाच्या बहिणीला वेळोवेळी पडणारी गूढ स्वप्नंविकृत बापशाळेत दिला जाणारा त्रास या सर्व प्रसंगांमुळे तर चित्रपट अधिकच भयप्रद होतो.

हा चित्रपट Joe Hill या अमेरिकन लेखकाच्या त्याच नावाच्या एका लघुकथेवर आधारित आहे. चित्रपट बघून झाल्यावर फार उत्सुकतेने लघुकथा वाचली आणि फारच निराश झालो. चित्रपटाच्या मानाने ही लघुच नाही तर लघुत्तम कथा आहे. चित्रपटात दिसणारं गडदडार्क वातावरणवेगवेगळ्या गूढ प्रसंगांची पखरण पुस्तकात कुठेच दिसत नाही आणि असले तरी जेमतेम तोंडी लावण्यापुरतेच हे प्रसंग दिसतात. अंतिम संघर्षही चित्रपटात फारच तीव्र स्वरूपात मांडला आहे जो पुस्तकात मात्र अगदीच किरकोळी काढल्यासारखा वाटतो. त्यामुळे दिग्दर्शक Scott Derrickson बद्दलचा आदर अजूनच वाढतो.

या लघुकथेच्या निमित्ताने यापूर्वीही वाचनात आलेल्या लघुकथा आणि त्यांच्यावर आधारित अप्रतिम चित्रपट यांची आठवण झाली आणि या सर्वात एक साम्य लक्षात आलं की सुरुवातीला सांगितलेला नियम लघुकथांना लागू पडत नाही. कादंबऱ्या या नेहमीच त्यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटांपेक्षा उजव्या ठरत असतीलही (फोरेस्ट गम्प आणि फर्स्ट ब्लड हे निदान मला तरी जाणवलेले अपवाद वगळता)परंतु लघुकथांच्या बाबतीत मात्र हा नियम सपशेल उताणा पडतो. आपण ब्लॅक फोन व्यतिरिक्त अन्य काही लघुकथांचीही उदाहरणं पाहू.


२०१६ साली प्रदर्शित झालेला Arrival हा चित्रपट. Amy Adams आणि Jeremy Renner च्या अप्रतिम अभिनयाने नटलेला हा सायफाय/एलिअन्स प्रकारातला परंतु विचारगर्भ असा नो-नॉन्सेन्स चित्रपट. एलिअन्स प्रकारच्या चित्रपटांत नेहमी आढळणाऱ्या झगमगाटी प्रकाराला पूर्णतः फाटा दिलेला असल्यानेच कदाचित तो फार यश संपादन करू शकला नसावा परंतु परग्रहांवरील जीवांशी संवाद साधणे, भाषा, तंत्र विकसित करणे याबरोबरच चित्रपटात संपूर्ण वेळ प्रेक्षकांच्या सोबत वावरणारं परंतु स्वाभाविक कारणांमुळेच दिसू न शकणारं आणि अखेरच्या काही क्षणांत उघड होणारं रहस्य पाहून प्रेक्षकाला प्रचंड धक्का बसतो.

हा चित्रपट Ted Chiang च्या 'Story of Your Life and Others' या नावाच्या कथासंग्रहातल्या त्याच नावाच्या लघुकथेवर आधारित आहे. पुस्तकातही वर उल्लेखलेले प्रसंगघटनापरग्रहवासीत्यांना भाषा शिकवण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची खटपट करणारे भाषातज्ज्ञ आणि या साऱ्याबरोबर समांतर चालणारं आणि अखेरीस उघड होणारं रहस्य हे सगळं सगळं आहेच. परंतु तरीही चित्रपट जेवढा अवाक करतोमनाची पकड घेतो तितका परिणाम काही लघुकथा संपल्यावर वाटत  नाही. हे कदाचित दृश्य माध्यमाचं यश असावं असंही म्हणता येईल.

पुढची दोन उदाहरणं कदाचित धक्कादायक वाटण्याचा संभव आहे आणि त्यामुळे हे ही सांगायला हवं की या दोन उदाहरणांमध्ये उल्लेख होणारेच नव्हे तर या लेखात उल्लेख झालेले सगळे चित्रपट मी आधी बघितले आणि त्यानंतर ते ज्यावर आधारित आहेत ती पुस्तकं/लघुकथा/लघुकादंबऱ्या (novella) वाचल्या आणि त्यामुळे चित्रपटाने उभं केलेलं चित्र अधिक प्रभावी वाटून तुलनेने पुस्तकांचा प्रभाव पडला नसेल असं होण्याचीही शक्यता मला पूर्णपणे मान्यच आहे.

अत्यंत अभ्यासू आणि फिल्ममेकिंगचे विविध प्रयोग यशस्वीरीत्या करणाऱ्या दिग्दर्शक Christopher Nolan याचा Memento हा चित्रपट त्याचा भाऊ Jonathan Nolan याने लिहिलेल्या Memento Mori या लघुकथेवर आधारित आहे. अर्थात चित्रपटात बरेच बदल केलेले आहेत तसेच दोन निरनिराळ्या कालरेषांवर घडणारे प्रवास हे प्रत्यक्षात समोर घडताना पाहणं आणि तशी कल्पना करून वाचन करणं यात दृश्य माध्यमाला मिळणाऱ्या स्वाभाविक फायद्यामुळे चित्रपट हा लघुकथेपेक्षा अधिक उजवा आणि प्रेक्षणीय ठरतो हे नक्की.


पुढचं उदाहरणही असंच कदाचित न पटणारं आहे. पण अर्थात हे ही आहे की हा चित्रपट आणि तो ज्या

लघु-कादंबरी (novella) वर आधारित आहे ते दोन्ही त्याच तोलामोलाचे आहेत असं म्हंटल तर वावगं ठरू नये. ते म्हणजे अनेक दशकं लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर असणारा Shawshank Redemption हा चित्रपट आणि Stephen King या अमाप लोकप्रिय अशा अमेरिकन भयकथाकाराची Rita Hayworth and Shawshank Redemption ही लघु-कादंबरी. चित्रपट आणि कादंबरी हे जवळपास तोलामोलाचे असले तरी चित्रपटात सुरुवातीस येणारे काही करुण प्रसंगनिवेदक रेड आणि त्याच्या संबंधातले काही प्रसंग यामुळे चित्रपट कादंबरीपेक्षा किंचित उजवा वाटू शकतो.

अर्थात ही झाली मी वाचलेल्या आणि पाहिलेल्या कलाकृतींची उदाहरणं. अशी अजूनही अनेक उदाहरणं असतीलच किंवा ती वर मांडलेल्या मुद्द्याच्या विरुद्ध जाणारी किंवा थोडक्यात "पुस्तक हे चित्रपटापेक्षा श्रेष्ठ असतं" या सर्वमान्य नियमाचं पालन करणारीही असतील आणि त्यामुळेच त्यांचा या आपल्या आजच्या लेखात समावेश झाला नाही हे उघड आहे. आणि अर्थातच पुस्तक किंवा मूळ कलाकृती ही त्याच्या रूपांतरित आवृत्तीपेक्षा (चित्रपट/सिरीज) पेक्षा श्रेष्ठ असते हे सिद्ध करणारी बोकीलांच्या 'शाळापासून ते जॉन ग्रिशमडॅन ब्राऊनली चाईल्डमायकल कॉनली यांच्या पुस्तकांपर्यंतची 'Lost in Translation' ची असंख्य उदाहरणं आपणा सर्वांना माहित असतातच आणि त्यावर वेळोवेळी लेखन आणि चर्चा झालेल्या असल्याने या नियमाच्या विरुद्ध असणारी 'Gained in Translation' ची काही निवडक उदाहरणं नजरेस पडली म्हणूनच हा लेखनप्रपंच!

Thursday, March 24, 2022

अन्याय आणि हतबलतेची विस्मृतीत गेलेली कथा : काश्मीर फाईल्स

"इसे exodus नही genocide कहिए।"

(exodus :
एखाद्या समूहाचं पलायन/स्थलांतर, genocide : वंशविच्छेद)

'काश्मीर फाईल्स' सुरु झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच हा संवाद पहिल्यांदा कानावर येतो. ज्यात एक प्रकारचा क्रोध, घृणा ओतप्रोत भरलेली आहे असा हा संवाद त्यानंतर वेळोवेळी आपल्याला ऐकवला जातो. सुरुवातीला प्रेक्षकाला कदाचित प्रश्न पडू शकतो की नक्की काय आहे हे exodus आणि genocide आणि genocide च्या ऐवजी exodus वापरल्याने असा काय फरक पडणार आहे? चित्रपटाच्या सुरुवातीला पडलेला हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं हृदय पिळवटून टाकणारं वेदनादायक उत्तर यातला प्रवास म्हणजे 'काश्मीर फाईल्स' हा चित्रपट.

१९९०-९२
, २०१६ आणि सद्यकाळ अशा तीन कालरेषांवर (टाईमलाईन्स) हा चित्रपट घडतो आणि अरेखीय (नॉन-लिनिअर) पद्धतीने आपल्यापुढे सादर केला जातो. सचिन तेंडुलकर सारख्या भारताच्या लाडक्या सुपुत्राला इंडियन डॉग म्हणून हिणवून शिवीगाळ केली जाण्याचा प्रसंग हा चित्रपटाच्या सुरुवातीला बसणारा एक हलका अर्थात सॉफ्ट धक्का. त्यानंतर चित्रपटभर येऊ घातलेल्या अमानुष प्रसंगांच्या मालिकेसाठी प्रेक्षकाच्या मनाची बैठक तयार करण्यासाठी योजलेला एक छोटासा प्रसंग म्हणून याकडे पाहिलं जाऊ शकतं.

इस्लामी अत्याचार
, पाकिस्तान पुरस्कृत धर्मांध अतिरेकी यांना काही वर्षांपूर्वी हिंदी चित्रसृष्टीत पडोसी मुल्क अशा गोंडस नावाने संबोधण्याची पद्धत होती. अर्थात अलीकडच्या काही वर्षांत आलेल्या चित्रपटांमध्ये ही चौकट मोडण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी ती पूर्णतः मोडली जाईल असा प्रयत्न न करता सावधपणे पाऊल टाकण्याकडेच चित्रकर्त्यांचा कल असतो. 'काश्मीर फाईल्स' या सगळ्या सावध चौकटी मोडून, तोडून, विस्कटून, उखडून टाकून दूर भिरकावून देतो. चित्रपटात सावध मांडणी (किंवा subtlty) किंचितही आढळणार नाही. काश्मीर मधील इस्लामी अत्याचार, त्यातला पाकिस्तानचा हात, राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा ही आणि अशी काळी सत्य हा चित्रपट कोणाचीही भीडभाड न बाळगता उच्चरवाने आपल्यासमोर मांडतो. यातला हिंसाचार, क्रौर्य, सत्य हे इतकं हिडीस आणि क्रूर आहे की प्रेक्षकाला काही प्रसंगी वाटू शकतं की हे असे सगळे भयंकर प्रकार खरोखर घडले असतील का? आणि त्या सर्वांना एकाच छोट्याशा वाक्यात निरुत्तर करणारा संवाद आपल्या कानावर येऊन आदळतो. "कश्मीर का सच इतना सच है की वो झूठ लग सकता है"!!

विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या टीमने सुमारे ४ वर्षं अथक परिश्रम घेऊन, संशोधन करून, सरकारी कागदपत्रं, सरकारी अर्काईव्हज मधले व्हिडीओ बघून, हजारो काश्मीर विस्थापित आणि त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून चित्रपटाची मांडणी केली. यातले असंख्य अनुभव, त्यातलं भीषण क्रौर्य, अगणित अत्याचार, सामूहिक बलात्कार, सामूहिक हत्याकांडं, मुंडकी उडवणे, अवयव छाटणे यांसारख्या अत्यंत अमानुष घटनांनी भरलेले आहेत की ते चित्रपटात जसेच्या तसे दाखवणं हे शक्यच नसलं तरीही अगदीच subtle राहून त्यांची सौम्य मांडणी करणं हे ही सर्वस्वी अशक्य होतं. आणि त्यामुळेच या चित्रपटातील घटना आणि प्रामुख्याने संवाद हे अतिशय टोकदार आहेत. सद्यस्थितीला थेट भिडणारे आहेत. तत्कालीन निष्क्रिय राजकारणी आणि तथाकथित चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमं यांच्या दुतोंडीपणावर आसूड ओढणारे आहेत.

१९४६ मध्ये बंगालमध्ये ज्याप्रमाणे जिन्ना आणि सुऱ्हावर्दी यांनी मिळून
'डायरेक्ट अ‍ॅक्शन डे' घोषित करून मुस्लिमांद्वारे हिंदूंचं नृशंस हत्याकांड घडवून आणलं अगदी त्याच प्रकारे काश्मीरच्या खोऱ्यात तेथील मुस्लिम आणि पाक पुरस्कृत अतिरेकी यांच्या माध्यमातून अतिशय नियोजनबद्ध रीतीने १९-२०-२१ जानेवारी १९९० या तीन दिवसांत हिंदूंचा समूळ वंशविच्छेद केला गेला. १८ जानेवारीला तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी राजीनामा दिला आणि राज्यपाल जगमोहन यांची नियुक्ती होऊन ते तिथे पोहोचेपर्यंत सुमारे ३ दिवस राज्य निर्नायकी अवस्थेत होतं. १५ मिनिटं पोलीस हटवा आणि मग हिंदूंची अवस्था बघा अशा खुल्या धमक्या देणाऱ्या धर्मांधांच्या हातात ७२ तास एखाद राज्य मिळाल्यावर त्यांनी तेथील हिंदूंची काय अवस्था केली असेल याचा आपण विचारही करू शकत नाही.

"
रलीव (इस्लाम स्वीकारा), गलीव (मरा) या चलीव (पळून जा)" किंवा "अल सफा बट्टे दफा" (पंडितांनो काश्मीर सोडून जा) किंवा "काश्मीर बनेगा पाकिस्तान, पंडित औरतों के साथ पर पंडितोंके बगैर", "पंडितो, काश्मीर छोडो, लेकिन अपनी औरते छोड जाओ", "नारा ए तबलीग अल्ला हू अकबर" यांसारख्या महाभयंकर क्रूर, लाजिरवाण्या आणि हल्लेखोरांचा उद्देश पुरेसा स्पष्ट करणाऱ्या घोषणा जशाच्या तशा दाखवल्या आहेत. आणि त्याहून धक्कादायक म्हणजे अनेक प्रसंगांमध्ये या घोषणा लहान मुलांच्या तोंडी आलेल्या आहेत. साधारण याच अर्थाच्या घोषणा जेएनयुच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी दाखवताना चित्रकर्त्यांनी योग्य तो मुद्दा प्रेक्षकांच्या मनावर ठसेल याची पूर्ण खबरदारी घेतली आहे. काळ बदलला, व्यक्ती बदलल्या, परिस्थिती बदलली तरीही काश्मिरातली परिस्थिती, काश्मीरला भारतापासून मुक्ती देण्याची मागणी करणारी देशद्रोही मानसिकता ही आहे तशीच आहे हे सद्यस्थितीतील "तुकडे गॅंग" च्या घोषणा आणि १९९० मधल्या काश्मिरी अतिरेक्यांच्या घोषणा यांच्यातल्या साम्याद्वारे अधोरेखित होतं

(
जेएनयु) विद्यापीठाच्या भिंतींवर लेनिन, कार्ल मार्क्स यांची ठायीठायी दिसणारी चित्रं त्यांची वैचारिक दिशा स्पष्ट करतात. त्याचप्रमाणे भाईचारा, सच्चा मुसलमान वगैरे तुणतुणी न वाजवता आपल्याच मित्र आणि शेजारी बांधवांना पकडून देणारे काश्मिरी मुसलमान आणि त्यांना फूस लावणारे पाकिस्तानी मुसलमान हे ही जसे आहेत तसे थेट दाखवले जातात. काश्मीर मधील परिस्थिती चिघळत असतानाही ती आवरण्यासाठी काहीही न करणारे फारूक अब्दुल्लासारखे निर्लज्ज मुख्यमंत्री तसेच रेफ्युजी कॅम्पमधील भयंकर परिस्थिती पाहूनही तिकडे दुर्लक्ष करणारे मंत्री दिसतात आणि इस्लामी अतिरेक्यांना पाहून गर्भगळीत झालेले पोलीसही दाखवले जातात.

यातली अनेक पात्रं ही प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भेटीला येतात. २०-२५ पंडितांना निव्वळ हिंदू असल्याने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे असल्याने ठार मारलं याची ऑन स्क्रीन जाहीर कबुली देणारा बिट्टा कराटे आणि अनेक पंडितांच्या हत्याकांडात सहभागी असणारा, सातत्याने स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारा आणि तरीही भारताच्या तत्कालीन पंतप्रधांकडून भेटीचं आमंत्रण दिलं जाणारा आणि अनेक मीडिया हाऊसेसद्वारा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केला गेलेला देशद्रोही आणि इस्लामी अतिरेकी यासिन मलिक या दोन (आणि इतरही अनेक) अतिरेक्यांचं प्रातिनिधिक पात्र असलेला फारूक मलिक बिट्टा हा चिन्मय मांडलेकर यांनी अप्रतिम रंगवला आहे. अरुंधती रॉय, बरखा दत्त आणि अशा अनेक तथाकथित महिला विचारवंतांची प्रातिनिधिक भूमिका अर्थात प्रोफेसर राधिका मेननचं पात्र पल्लवी जोशी यांनी जिवंत केलं आहे. भयभीत काश्मिरी जनता, असहाय प्रशासन, नाकर्तं पोलीस खातं हे अनुक्रमे पुष्कर पंडित यांच्या भूमिकेत अनुपम खेर, आय ए एस ऑफिसर ब्रह्मदत्त अर्थात मिथुन चक्रवर्ती आणि डीजीपी अर्थात पुनीत इस्सर यांनी उत्कृष्टरित्या रेखाटल्या आहेत.

या सगळ्या ज्येष्ठांच्या मांदियाळीत तुलनेने नवीन आणि तरुण चेहरा असलेल्या दर्शन कुमार याने गोंधळलेला युवक ते विचारांची दिशा स्पष्ट झालेला तरुण कृष्णा पंडित उत्तम साकारला आहे. अर्थात त्याची
भूमिका ही स्टोरीबॅक्ड आहे. त्याला पडद्यावर वावरण्यासाठी मिळालेला वेळ, चित्रपटाच्या अखेरीस येणारं स्वगत कम भाषण हे चित्रपटाचं एक महत्वाचं बलस्थान आहे. काश्मीरचा प्राचीन इतिहास, तेथील विद्वान, त्यांचे निरनिराळ्या क्षेत्रातील असंख्य शोध, तेथील शैक्षणिक प्रगती, ज्ञानदान करणारी कैक विद्यापीठं, हजारो ग्रंथ आणि या सर्वांवर इस्लामी धर्मांध माथेफिरुंच्या टोळ्यांनी केलेली अगणित अमानुष आक्रमणं या साऱ्यासाऱ्याचा लेखाजोखा चित्रपटाच्या अखेरीस आपल्या भेटीस येतो.



या चित्रपटातील एक अतिशय महत्वाचं अंग म्हणजे छायाचित्रण. लॉंग शॉटद्वारे दाखवले जाणारे बर्फाच्छादित पार्श्वभूमीवरील अंधार
, स्फोट, मशिदींमधील घोषणा, हल्ले, खून आणि थोड्याच वेळात जणू काही झालंच नाही असा थंडगार प्रेताप्रमाणे पुन्हा दिसणारा बर्फाचा पांढरा रंग हा आपले राजकारणी आणि भारतातील उर्वरित राज्यांचा काश्मीर समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन याविषयी भाष्य करून जातो. त्याचप्रमाणे ट्रकमध्ये काश्मीरमधून पळून जात असताना पडद्यावर काळवंडलेलं आणि त्याचबरोबर झाडाच्या शेंड्यांनी झाकलेलं आकाश दिसतं आणि मुक्त आकाश अर्थात भयरहित भविष्य हे या काश्मिरी पंडितांसाठी किती अप्राप्य आहे, दिवास्वप्न आहे हे अधोरेखित केलं जातं. त्याचप्रमाणे पुष्करनाथ पंडित यांची भूमिका करणाऱ्या अनुपम खेर यांच्या महादेवाप्रमाणे निळ्या रंगात रंगवलेल्या परंतु अत्यंत भयभीत आणि दयनीय अवस्थेतल्या चेहऱ्याच्या क्लोजअपला चित्रपटाच्या पोस्टरवर आणि प्रमोशन्स/ट्रेलर्स मध्ये आवर्जून स्थान देणे ही देखील एक अतिशय विचारपूर्वक घेतलेली भूमिका आहे. आपला सनातन धर्म आणि देवदेवतांवर ओढवलेलं एक महासंकट या स्वरूपात प्रेक्षक चटकन त्या समस्येशी जोडले जातात.

चित्रपटात ठायीठायी पेरलेली काश्मिरी लोकगीतं ही चित्रपटाची भूमिका आणि  काश्मीरी पंडितांची असहाय उद्विग्नता मांडण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची भूमिका निभावतात. पुष्कर पंडितांच्या तोंडी येणारी त्याचप्रमाणे अनेकदा बॅकग्राऊंडला ऐकू येणारी काश्मीरी लोकगीतं ही काश्मिरी विस्थापितांची काश्मिरातल्या आपल्या स्वतःच्या घरी परतण्याची अतीव इच्छा परंतु ते शक्य नसल्याने येणारी अगतिकता
, हतबलता मांडून प्रेक्षकांना अक्षरशः घायाळ करतात.

वर म्हंटल्याप्रमाणे चित्रपटाची मांडणी थेट आहे. धोरणी किंवा ताकाला जाऊन भांडं लपवणारी नाही. ही मांडणी जागोजागी भेटणाऱ्या संवादांमधूनही दिसते. यात "चौथा स्तंभ अर्थात पत्रकारितेला राजकारण्यांची रखेल म्हंटलं जातं"
, शेख अब्दुल्लाच्या सरड्याप्रमाणे रंग बदलण्याच्या प्रवृत्तीवर आणि बदलत्या भौगोलिक स्थानानुसार (दिल्ली, जम्मू, काश्मीर) कम्युनिस्ट, कम्युनलिस्ट, नॅशनलिस्ट आणि सेक्युलरिस्ट अशी विविध रूपं साकारण्यावर ताशेरे ओढले जातात. प्रोफेसर राधिका मेनन आणि वैचारिक गोंधळ असणारा विद्यार्थी कृष्णा यांच्यातले अनेक संवाद तर कमाल जमून आले आहेत. काश्मिरींवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारासंदर्भात निषेध व्यक्त करताना कृष्णा त्याला पिळवणूक म्हणतो तर प्रोफेसर राधिका मेनन त्याला निर्लज्जपणे समजावते की "अरे ही पिळवणूक नाही, हे राजकारण आहे". त्याचबरोबर प्रोफेसर राधिकाच्या "सत्ता त्यांची असली तरी (इको) सिस्टम आपली आहे", "आपल्याला उपाय द्यायचेच नाहीयेत, आपल्याला फक्त 'आशा' दाखवायची आहे की उपाय आहेत" यासारख्या धूर्त संवादांतून काश्मीर प्रश्न भडकवत ठेवू इच्छिणाऱ्या देशद्रोही विचारांचं शहरी नक्षलींच्या विचारांशी असणारं साम्य चतुराईने अधोरेखित केलं जातं.

काश्मीरमध्ये पंडितांवर झालेलय कैक हल्ल्यांचे आणि हत्याकांडाचे उल्लेख चित्रपटात येतात. पण त्यांचा उल्लेख इतक्या कमी वेळेपुरता होतो की त्याबद्दल अजून माहिती दाखवली जायला हवी होती असं आपल्याला वाटून जातं. अर्थात सुमारे तेराव्या शतकापासून होणारी माथेफिरू इस्लामी आक्रमणं अडीच तीन तासांत दाखवणं काम नक्कीच अवघड आहे. (अशा वेळी मनात सहज विचार डोकावून जातो की काश्मीर फाईल्सवर सिरीज यायला हवी ज्यात चित्रपटात वेळेअभावी दाखवायचे राहून गेलेले अनेक प्रसंग तपशीलवार मांडता येतील.). चित्रपटात दाखवताना प्रत्यक्षात घडलेल्या अनेक प्रसंगांमधील काही निवडक प्रसंग आणि पात्रं यांचं एकत्रीकरण करून ते आपल्यासमोर मांडले आहेत. चित्रपटात
'बट्टा मझार' (ब्राह्मणांची स्मशानभूमी) या सुमारे चौदाव्या शतकात झालेल्या पंडितांच्या नृशंस हत्याकांडाचा धावत उल्लेख येतो. सिकंदर बुतशिकन या अत्याचारी इस्लामी राज्यकर्त्याने काश्मीरमधील सुमारे लाखभर पंडितांसमोर दोनच पर्याय ठेवले एक म्हणजे जानवी तोडा (धर्म बदला) अथवा मृत्याला सामोरे जा. सर्व पंडित धैर्याने मृत्याला सामोरे गेले. त्यांना डाल लेक मध्ये बुडवून मारण्यात आलं आणि या घटनेनंतर त्यांच्या तोडलेल्या जानव्यांचा ढीग करण्यात आला ज्याचं वजन सुमारे सदतीस किलो भरलं. चित्रपटाच्या अखेरीस अगदी अलीकडे म्हणजे २००३ मध्ये झालेला नदीमार्ग हत्याकांडाचा प्रसंग तपशीलवार येतोच आणि त्याचबरोबर काश्मीरमधील गरीब शालेय शिक्षिका गिरीजा टिक्कूवर ओढवलेले नृशंस अत्याचारही दाखवले जातात. अर्थात प्रत्यक्षात झालेले अत्याचार, हिंसाचार, बलात्कार, हत्याकांड यांची अमानुषता इतकी भयंकर आहे की ते जसेच्या तसे दाखवले असते तर चित्रपटावर उथळ आणि बटबटीतपणाचे शिक्के लागले असते. त्यामुळे थेट प्रसंग दाखवण्याचा मोह टाळून ते किंचित सौम्य करून दाखवण्याचा दिग्दर्शकाचा निर्णय अतिशय योग्यच म्हंटला पाहिजे.

चित्रपटाच्या पूर्वार्धात अनेकदा येणारा "इसे
exodus नही genocide कहिए" हा संवाद उत्तरार्धात जवळपास नाहीसा होतो. पण तो तसा संवाद का असतो, त्याचा अर्थ काय हे सुरुवातीला स्पष्टपणे समजावून सांगितलं जात नाही. पण आता शेवटाकडे त्या संवादाची गरज अर्थातच उरलेली नसते आणि तो समजावून सांगण्याचीही. कारण उरला असतो तो फक्त दाटल्या गळ्यांनी, भरल्या डोळ्यांनी आणि दाबल्या हुंदक्यांनी व्यापलेला अवकाश!


-हेरंब ओक